मागील २ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी सोमवारी मुंबईत शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा निघाला. अखिल भारतीय किसान सभेनं पुकारलेल्या या मोर्चात राज्यभरातील जवळपास २० हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. या आंदोलकांनी रविवारी संध्याकाळी मुंबईतील आझाद मैदानात धडक दिली आहे. तसंच शेतकऱ्यांच्या या मोर्चाला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठींबा दिला आहे.
दरम्यान, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हा मोर्चा होणार असल्यानं म्हणजेच सोमवारी २५ जानेवारी रोजी होणार असल्यामुळं मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. किसान मोर्चावर ड्रोनची नजर असणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर १०० वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि ५०० हून अधिक पोलीस शिपाई रस्त्यावर असणार आहेत.
शुक्रवारपासूनच पोलिसांनी नाकाबंदी सुरु केली आहे. येणारी वाहणं तपासून ती शहरात सोडली जात आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.