केंद्रीय गृह मंत्रालयाने १५ ऑक्टोबरपासून देशभरातील सिनेमागृह सुरू करण्यास परवानगी दिल्यानं सिनेक्षेत्रालात मोठा दिलासा मिळाला आहे. मागील ६ महिन्यांपासून सिनेमागृह बंद आहेत. कोरोनाचं संकट आणि लाॅकडाऊनमुळे असंख्य सिनेमांचं प्रदर्शन रखडलं होतं. या संदर्भातील मानक कार्यप्रणाली (SOP) गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. (Cinema halls to open with 50 per cent occupancy)
या मानक कार्यप्रणालीनुसार येत्या १५ आॅक्टोबरपासून केवळ ५० टक्के क्षमतेनेच सिनेमागृह सुरू करता येतील. आपापल्या राज्यांत सिनेमागृह सुरू करायची की नाहीत, याचा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारचा असणार आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील सिनेमागृह सुरू होतील की नाही, यासाठी प्रेक्षकांना महाराष्ट्र सरकारच्या परवानगीची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
सिनेमागृहाच्या एकूण आसनक्षमतेच्या केवळ ५० टक्के प्रेक्षकांनाच सिनेमागृहात प्रवेश देता येईल. त्यामुळे प्रेक्षकांना एक सीट सोडून बसावं लागेल. जी सीट सोडण्यात येईल, त्यावर न बसण्याची खूण करावी लागेल. सिनेमागृहात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क घालणं बंधनकारक असेल. शिवाय सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशनची अट पाळणं बंधनकारक असेल.
हेही वाचा - १५ आॅक्टोबरपासून शाळा उघडणार, सरकारच्या गाइडलाइन्स जारी
◾️Cinema halls to reopen from 15th October
— PIB India (@PIB_India) October 6, 2020
◾️To operate with 50% occupancy
◾️Only packed food to be allowed
◾️Proper ventilation and AC temperature in the range of 24 to 30 degree Celsius
SOP for exhibition of films⬇️ pic.twitter.com/cFDwAZMA3Z
सिनेमा सुरू होण्याआधी जनजागृतीच्या उद्देशाने एक शाॅर्ट फिल्म दाखवणं बंधनकारक असेल. मध्यांतरामध्ये प्रेक्षकांना इतरत्र न जाण्याचं आवाहन करण्यात यावं. प्रेक्षकांना आवश्यकता असल्यास केवळ पॅकेज फूड देण्यात यावं. सिनेमागृहातील एसीचं तापमान २४ ते ३० डिग्री सेल्सिअसच्या मध्ये असणं बंधनकारक असेल. सिनेमागृह, सीटची सातत्यानं साफसफाई आणि सॅनिटायझेशन करण्यात यावं. प्रेक्षकांना आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्याचा सल्ला द्यावा. आवश्यकता भासल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी प्रेक्षकांचे फोन क्रमांक घ्यावे, अशा अटी घालून देण्यात आल्या आहेत.
मागील ६ महिन्यांच्या काळात सिनेक्षेत्र पूर्णपणे ठप्प असल्याने क्षेत्राचं हजारो कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच सणासुदीच्या आधी सिनेमागृह सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने सिनेनिर्मात्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दसरा-दिवाळी आणि वर्षाअखेरीस सिनेमे प्रदर्शित करून चांगली कमाई करण्याचा उद्देश सर्वांनीच समोर ठेवला असेल.