अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या तॉक्ते चक्रीवादळाचा तडाखा राज्याच्या किनारपट्टीलादेखील बसणार आहे. मुंबई, ठाणे पालघर भागांत यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. १४ ते १६ मे दरम्यान मुंबई आणि राज्याच्या किनारपट्टीला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
मुंबईत फार मोठे नुकसान होण्याची शक्यता नाही. मात्र तरीही मुंबईतील कोविड सेन्टरच्या जवळपास असणाऱ्या अनेक झाडांची छाटणी पालिकेनं सुरू केली आहे. विशेष म्हणजे ऑक्सिजन टँकवर झाडं पडू नयेत याची काळजी घेतली जात आहे.
महाराष्ट्राचा विचार करता राज्याच्या किनारपट्टी असलेल्या भागाला याचा मोठा फटका बसू शकतो. यात प्रामुख्यानं मुंबई, ठाणे पालघर भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
१५ मे पासून महाराष्ट्र किनाऱ्यावरील आणि बाहेर असलेल्या मच्छिमारांना IMDनं समुद्रात जाऊ नये असा सल्ला दिला आहे. रत्नागिरी, पुणे, सोलापूर, बीड, अहमदनगर, सिंधुदुर्ग, लातूर, सांगली, अशा वेगळ्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस तसंच गारा पडण्याची शक्यता आहे.
१४ आणि १५ मेपर्यंत आयएमडीनं पिवळा इशारा जारी केला आहे. सातारा, नांदेड, कोल्हापूर आणि उस्मानाबादमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहिल. तर कमाल तपमान साधारण ३४ अंश सेल्सिअस राहील असा अंदाज आयएमडी मुंबईनं येत्या ४८ तासांसाठी वर्तवला आहे.
अरबी समुद्रात १६ मे ला निर्माण होणा-या चक्रीवादळा संबधित सविस्तर माहीती देत आहेत, शुभांगी भुते, वैज्ञानिक, प्रादेशीक हवामान केंद्र, मुंबई.@RMC_Mumbai @DisasterState pic.twitter.com/lL2t9GFMu1
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 12, 2021
हे चक्रीवादळ २०२१ वर्षातील पहिलं चक्रीवादळ असणार आहे. याचं नाव तॉक्ते (Tauktae) ठेवण्यात आलं आहे. या चक्रीवादळाचं नाव म्यानमारनं ठरवलं आहे. तॉक्ते याचा अर्थ मोठा आवाज करणारी पाल असा होतो.
गुजरातबरोबरच गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ आणि लक्षद्वीपला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं किनारपट्टीच्या भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसंच मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा