मुंबईत विकास कामांसाठी गेल्या काही वर्षांपासून झाडांचा बळी दिला जात आहे. झाडांच्या बेसुमार कत्तलीमुळे पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनेल, असं म्हणत पर्यावरणप्रेमींकडून याला जोरदार विरोध होत आहे. पण त्यानंतरही मुंबईत झाडांच्या कत्तली सुरूच आहेत. नव्या वर्षात अर्थात १ जानेवारी ते १५ जानेवारीदरम्यान ७३५ झाडांची कत्तल करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने सूचना-हरकती मागवल्या आहेत. त्यामुळे ७३५ झाडांवर कुऱ्हाड कोसळणार हे निश्चित.
मुंबईत मेट्रो, मोनो, उड्डाणपुल, महामार्ग, बुलेट ट्रेन, रस्ते, रस्ता रूंदीकरण, व्यावसायिक-निवासी बांधकाम अशा एक ना अनेक कामांसाठी झाडांची कत्तल केली जात आहे. मेट्रो प्रकल्पात तर मोठ्या संख्येने झाडांची कत्तल होणार असून आरे जंगलही नष्ट होणार आहे. असे झाल्यास मुंबईत पर्यावरणाचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे झाडांची कत्तल रोखत वा कमीत कमी झाडं कापत विकास मार्गी लावता येईल का? याचा विचार करण्याची गरज होत आहे. पण याकडे दुर्लक्ष करत सरकार झाडांच्याच मुळावर उठल्याचा आरोप सेव्ह ट्री आणि सेव्ह आरेकडून होत आहे.
सेव्ह ट्रीचे सदस्य झोरू बाथेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंत वृक्ष प्राधिकरणाने सहा जाहीर निवेदनं प्रसिद्ध करत ७३५ झाडांच्या कत्तलीसाठी सूचना-हरकती मागवल्या आहेत. मेट्रो आणि रस्ते रूंदीकरणासाठी ही कत्तल करण्यात येणार आहे. मालाड, भांडुप, ट्रॉम्बे, जोगेश्वरी, अंधेरी, पवई, विक्रोळीसह अन्य ठिकाणच्या झाडांचा यात समावेश आहे.
मेट्रोसह अन्य मोठ्या प्रकल्पातील झाडांची कत्तल रोखावी वा झाडांना धक्का न पोहोचता प्रकल्प मार्गी लावावेत, यासाठी आम्ही रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढत आहोत. पण यंत्रणा वा सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसून दिवसेंदिवस झाडांच्या कत्तलीची संख्या वाढतच चालल्याचे सांगत बाथेना यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर वृक्ष प्राधिकरणाकडे सूचना-हरकती नोंदवूनही काही होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा