कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्रातील पोलीस जीवाची बाजी लावून कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळत आहेत. अशा स्थितीत एका पोलीस कर्मचाऱ्याने कोरोनापासून बचावासाठी सॅनिटायझर, मास्क पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याची व्यथा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली होती. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याची बदली (leader of the opposition devendra fadnavis demands to cancles abrupt transfer of police constable sanjay shule) करण्यात आली. ही बदली ते राहात असलेल्या ठिकाणापासून सुमारे १४० किमी लांब करण्यात आल्याने हा बदली आदेश मागे घेण्याची विनंती करणारं पत्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.
मनोबल खच्ची करणारं
यासंदर्भात लिहिलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, कोरोनाशी लढताना पोलीस दलातील जवान स्वत:चा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. आतापर्यंत राज्यातील २३०० हून अधिक पोलीस कोरोनाग्रस्त झाले आहेत. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशात पोलिसांनी केवळ प्राथमिक सुविधांची अपेक्षा केली, तर त्यांना शिक्षा म्हणून बदली करणं, हे त्यांच्यावर अन्याय करणारं आहे. संपूर्ण पोलीस दलाचं मनोबल खच्ची करणारं आहे.
हेही वाचा- महाराष्ट्रात लष्कराला बोलवा म्हणणाऱ्यांनो ‘हे’ आकडे बघा- उद्धव ठाकरे
पोलिसांना प्राथमिक सुविधांची अपेक्षा व्यक्त करणार्या वाशीम जिल्ह्यातील पोलिस हवालदार श्री संजय घुले यांना शिक्षा म्हणून केलेली बदली तत्काळ रद्द करण्याबाबत मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांना पाठविलेले पत्र... @CMOMaharashtra pic.twitter.com/xXDsoM38we
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 30, 2020
व्हिडिओ व्हायरल
नागपूर येथील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मी मध्यंतरीच्या काळात मुंबई ते नागपूर आणि पुन्हा नागपूर ते मुंबई असा रस्त्याने प्रवास केला होता. १७ मे रोजी नागपूरहून मुंबईला परतत असताना वाशीम जिल्ह्यातील जऊळका पोलीस स्थानक, किन्हीराजा पोलीस दलातील हवालदार संजय घुले यांची मार्गात भेट झाली होती. मी त्यांची विचारपूस केली असता, सॅनिटायझर किंवा मास्क यापैकी कोणत्याही सुविधा मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं. कुणीतरी या घटनेचा व्हिडिओ काढून व्हायरल केला.
गंभीर प्रकार
त्यानंतर २८ मे रोजी राज्याचे गृहमंत्री वाशीम जिल्ह्यात येऊन गेले असता त्याच दिवशी पोलीस अधिक्षकांनी त्यांची किन्हीराजा येथून वाशीम जिल्ह्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या धनज इथं बदली (sanjay ghule had been shifted 200 km away from his home town in Washim district) केली. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून बदलीचं ठिकाण हे सुमारे १४० किमी अंतरावर आहे. केवळ प्राथमिक सुविधांची अपेक्षा करणाऱ्या पोलिसाची केवळ शिक्षा म्हणून एवढ्या दूरच्या अंतरावर बदली करणं हा प्रकार अतिशय गंभीर आहे. आधीच पोलीस दल व्यथीत असताना या प्रकारामुळे पोलीस दलात संतापाची भावना आहे.
त्यामुळे संजय घुले यांची शिक्षा म्हणून करण्यात आलेली बदली त्वरीत रद्द करण्यात यावी. तसंच पोलिसांना तात्काळ प्राथमिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे.
हेही वाचा- Lockdown 5.0: महाराष्ट्र सरकारची नियमावली जाहीर, तुम्हाला वाचायलाच हवी...