लैंगिक शोषणातून वाचलेल्या पाच हजार स्त्री-पुरूषांनी एकत्र येत गुरूवारी मुंबईतील सोमय्या मैदानात डिग्निटी मार्च काढला. मुंबईतून सुरू झालेला हा डिग्निटी मार्च दिल्लीपर्यंत जाणार असून यात लैंगिक हिंसाचाराबद्दलची वृत्ती बदलण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. देशभरातील २४ राज्यातील २०० जिल्ह्यांमधून दहा हजार किलोमीटर अंतर पार करून हा डिग्निटी मार्च काढण्यात येणार आहे. गरिमा अभियानांतर्गत या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
लैंगिक शोषणाचे बळी पडलेल्यांना समाजाच्या अवहेलनेचा सामना करावा लागतो. मात्र आरोपींना कठोर शिक्षा होत नाही. या पार्श्वभूमीवर महिला आणि मुलांविरोधातील लैंगिक शोषणाविरोधात गरिमा अभियानांतर्गत ६५ दिवसांची मोहिम राबवण्यात येत आहे. लैंगिक शोषण आणि अत्याचाराविरोधात लढण्यासाठी कायदे, नियम यांची माहितीही या उपक्रमादरम्यानं देण्यात येत असून ‘गरिमा अभियान’ संस्थेने केलेल्या ‘स्पीक आऊट’ सर्वेक्षणातून ही संकल्पना उदयास आली आहे. या सर्वेक्षणातून लैंगिक शोषितांची परिस्थिती चिंताजनक असल्याचे समोर आलं असून ९५ टक्के लैंगिक शोषणाच्या अत्याचारांची नोंदच झाली नसल्याचंही सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
लहान मुली, महिला यांच्यासह मुलांच्या लैंगिक शोषणाचं प्रमाण वाढत आहे. एनसीआरबीनं केलेल्या सर्वेक्षणानुसार २०१६ साली ३ लाख, ३८ हजार, ९५४ लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून हा आकडा २००७ पेक्षा ८३ टक्क्यांनी जास्त आहे. २००७ मध्ये महिलांविरोधात १ लाख ८५ हजार ३१२ गुन्ह्यांची नोंद झाली होती. विशेष म्हणजे २०१६ साली १०६ बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून या लैंगिक अत्याचाराला लहान मुले सहज बळी पडत असल्याचंही समोर आले होतं.
सायनच्या सोमय्या मैदानातून काढण्यात आलेला हा डिग्निटी मार्च २२ फेब्रुवारी २०१९ रोजी दिल्लीत संपणार आहे. या अभियानाला पाठिंबा देण्यासाठी ७८२२००११५५ या क्रमांकावर मिस्ड कॉल देण्याचं आवाहन गरिमा संस्था करत आहे. या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी समाजातील अनेक मान्यवर व्यक्ती सरसावल्या असून यात टिस्का चोप्रा, सुधा चंद्रन, लक्ष्मी अग्रवाल (स्टॉप अॅसिड अॅटॅक), सामुहीक बलात्कार कार्यकर्ता भंवरी देवी, एडेलगिव्ह फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या शहा, सत्यमेव जयते स्वाती भटकळ यांचा समावेश होता.
हेही वाचा -