यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दहावीचा अभ्यासक्रम बदलला असून या नव्या अभ्यासक्रमाची पहिलीच परीक्षा मार्च २०१९ मध्ये होणार आहे. या परीक्षेपासून इंग्रजी द्वितीय आणि तृतीय भाषा व गणित भाग १ व भाग २ या विषयांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. यामुळे ए, बी, सी, डी हे प्रश्नपत्रिकांचे प्रश्नसंच देण्यात येणार नसल्याचं परिपत्रक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलं आहे.
राज्यात सन २००४ पासून दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी बहुसंची प्रश्नपत्रिका पद्धती लागू करण्यात आली होती. त्यनुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना चार प्रकारच्या प्रश्नपत्रिका दिल्या जात असत. यामुळे कॉपीच्या प्रकरणांमध्ये घट झाली होती. मात्र यंदाच्या वर्षीपासून 'बालभारती'ने इयत्ता नववी व दहावीसाठी अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली आहे. त्याआधारे पाठ्यपुस्तकांची निर्मिती करताना सर्व विषयांच्या संदर्भात काही प्रमुख रचनात्मक बदल करण्यात आले आहेत.
यंदाच्या कृतिपत्रिकांमध्ये आकलन, उपयोजन, रसग्रहण मत व्यक्त करणे बंधनकारक असणार आहे. तसंच, यामध्ये पाठ्यपुस्तकावर आधारित आणि पाठ्यपुस्तकाबाहेरील प्रश्नांचाही समावेश असणार आहे. यामुळे कृतिपत्रिकांची अंमलबजावणी आणि मूल्यमापन करण्याच्या प्रक्रियांमध्ये सुलभता राहण्याच्या उद्देशानं इयत्ता दहावीसाठी इंग्रजी द्वतीय आणि तृतीय भाषा आणि गणित भाग १ व भाग २ या विषयांसाठी बहुसंची प्रश्नपत्रिकेची आवश्यकता नसल्याचं मत विषयतज्ज्ञ आणि बालभारती कार्यालयाकडून व्यक्त होत आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या दोन विषयांसाठी बहुसंची प्रश्नपत्रिका न ठेवता एकच प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय घेतला असून येत्या मार्च २०१९ च्या परीक्षेला हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.