राज्यात सध्याच्या घडीला फक्त आठवड्याभराचाच रक्तसाठा शिल्लक आहे. येत्या काळात रक्ताची लागणारी मोठी गरज लक्षात घेऊन रक्तदाते आणि सामाजिक संस्थांनी पुढं यावं, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (state health minister rajesh tope) यांनी केलं आहे.
कोरोनाच्या (coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी गुरूवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात उपलब्ध रक्तसाठ्याची माहिती दिली.
राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताची साठवणूक दीर्घकाळ करता येत नाही. केवळ कोरोनाच्या रुग्णांसाठी नव्हे तर अनेक वैद्यकीय उपचारांमध्ये , हिमोफेलीयाच्या रुग्णांसाठी रक्ताची गरज असते. अशावेळी सामाजिक संस्थांनी संचारबंदीकाळातील सूचनांचे पालन करून रक्तदान शिबीरे घ्यावीत.
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 27, 2020
ते म्हणाले, राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. राज्याच्या ब्लड बँकेच्या (blood bank) प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्याकडं केवळ ७ ते ८ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक आहे. रक्त केवळ ३५ दिवसच सुस्थितीत राहू शकतं. त्यामुळे ते दिर्घकाळ साठवून ठेवता येत नाही. सध्या केवळ कोरोनाच्या रुग्णांसाठी नव्हे, तर अनेक वैद्यकीय उपचारांमध्ये रक्ताची गरज लागते. थॅलेसिमिया, हिमोफिलियाच्या रुग्णांना सातत्याने रक्त लागतं. रक्ताची जागा इतर कुठलंही औषध घेऊ शकत नाही.
त्यामुळे येत्या काळात रक्ताची लागणारी गरज लक्षात घेऊन रक्तदात्यांनी पुढं यावं. प्रशासनानं रक्तदान शिबिराचं आयोजन करणाऱ्या संस्थांना सहकार्य करावं. संचारबंदीच्या काळातील सूचनांचं पालन करून सामाजिक संस्थांनी रक्तदान शिबिरं घ्यावीत. जिल्हा व पोलीस प्रशासनानं त्यांना सहकार्य करावं.रक्तदान शिबिरं घेताना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची काळजीही घ्यायला हवी, असं आवाहन देखील टोपे यांनी केलं.