एसएससी म्हणजेच दहावीची परीक्षा म्हटलं की सर्वांनाच टेन्शन येतं. आता तर नववीपासूनच दहावीच्या परीक्षेची तयारी करण्याचं फॅड आलं आहे. आता दहावीची परीक्षा अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपली असताना परीक्षेचं टेन्शन घालण्यासाठी '१० वी' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
जीवनात शिक्षणाचं अनन्यसाधारण महत्व आहे. जो शिकतो त्याला मान आणि अशिक्षीताला कस्पटासमान ही जगरहाटीच आहे. त्यामुळे आजच्या काळात शिक्षण ही मुलभूत गरज बनली आहे. शिक्षण म्हटलं की शाळा आणि अभ्यास आलाच... आणि अभ्यास म्हटल्यावर परीक्षाही आलीच... पहिलीपासून प्रत्येकजण वेगवेगळ्या परीक्षा देत असतो, पण या सर्वांमध्ये दहावीच्या परीक्षेला खूप महत्त्व असतं. १० वी च्या परीक्षेला नेहमीपेक्षा अधिक जोमाने अभ्यास करावा लागतो. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर काॅलेज जीवनाचा अनुभव घेण्याचा राजमार्ग मोकळा होतो.
१० वीचं टेन्शन असल्यामुळे मुलांना सतत अभ्यासाला लावणारे पालक घरोघरी पाहायला मिळतात. खरंतर ही परीक्षा महत्वाची असली तरी त्यासोबत येणारा मानसिक तणाव पालक आणि पाल्यांच्या मनावर होणारा आघात कितपत योग्य आहे? या आणि अशा काही प्रश्नांची उत्तरं देताना दहावीतील मुलांच्या आणि पालकांच्या मनोस्थितीवर भाष्य करणारा '१०वी' हा एक मराठी चित्रपट ८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. जरी १० वीची परीक्षा हा विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील मैलाचा दगड असला तरीही त्यावेळी येणाऱ्या टेन्शनचा व कदाचित त्यातून येणाऱ्या नैराश्याचा कसा सामना करता येऊ शकेल याचं उत्तर '१० वी' या चित्रपटात शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद मयूर राऊत आणि पियुष राऊत यांचे असून, या लेखक द्वयींनीच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली आहे. निर्माते सुधीर जाधव यांनी '१० वी' हा सिनेमा प्रस्तुतही केला आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहिल्या पोस्टरमध्ये सर्व कलाकारांचे चेहरे लपवत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. लेखक दिग्दर्शकांच्या मते हा चित्रपट विद्यार्थी आणि त्यांच्या जनकांच्या डोळ्यात अंजन घालणारा असून, जरी टेन्शनवाला असला तरी हसत-खेळत मांडण्यात आला आहे.
हेही वाचा -
डाॅ.अानंद तेलतुंबडेंची अटक अवैध, विशेष न्यायालयाचा निर्णय
सुनील बर्वे म्हणतोय 'जागते रहो'