रुपेरी पडद्यावर आजवर बऱ्याच रोमँटिक स्टोरीज आल्या आहेत, पण प्रत्येकाचा आपला एक वेगळा बाज पहायला मिळाला आहे. या चित्रपटातील प्रेमकथेचा बाज या सर्वांपेक्षा थोडा वेगळा आहे. बिहारसारख्या ठिकाणी हुंडा मागणाऱ्या तरुणाचं अपहरण केलं जातं आणि जबरदस्ती त्याच मुलीशी त्याचं लग्न लावून दिलं जातं. यासाठी मुलीचे वडील नवऱ्या मुलाला उचलून आणण्याची सुपारी देतात. अशा विवाहांना तिथं पकडवा शादी असं म्हटलं जातं. या चित्रपटाची कथाही याच रिवाजवर आधारीत आहे.
दिग्दर्शक प्रशांत सिंग यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन करताना पकडवा शादीची सांगड एका अशा प्रेमकथेशी घातली आहे, ज्याचा नायक आणि नायिका बालपणापासून एकमेकांना ओळखत असतात आणि तरुणपणी पुन्हा एकत्र येतात. तसं पाहिलं तर अशा प्रकारचा प्लॅाट आजवर असंख्य चित्रपटांमध्ये पहायला मिळाला असला तरी या चित्रपटात त्याची मांडणी काहीशी वेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे करताना पटकथेतील गुंता काहीसा वाढला आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि परीणीती चोप्रा ही जोडी या चित्रपटाचं आकर्षण आहे.
पकडवा शादी करण्यात पटाईत असलेल्या अभय सिंग (सिद्धार्थ मल्होत्रा)आणि बालपणी त्याच्यापासून दुरावलेली मैत्रीण बबली (परीणीती चोप्रा)यांची ही प्रेमकहाणी आहे. अभयचे वडील हुकूम देव सिंग (जावेद जाफरी)यांनी पकडवा शादीची सुपारी घ्यायची आणि त्यानं ती पूर्ण करायची असं काम सुरू असतं. एक दिवस एका लग्नाच्या सुपारीत अभयला बबली भेटते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. एकमेकांसोबत लग्न करणार असं वाटत असतं, पण बबलीचे वडील दुनियालाल यादव (संजय मिश्रा)तिच्या पकडवा शादीची सुपारी हुकूम देव यांना देतात. तेव्हा बबलीचा गैरसमज होतो आणि आपलं लग्न अभयशी होणार असं तिला वाटतं. अभय मात्र निर्दयीपणे आपल्या वडीलांनी हाती घेतलेलं काम करत असतो. अशातच अभय आपला नवरा होणार नसल्याचं बबलीला समजतं. त्यानंतर बबली आणि तिची मित्रमंडळी अभयलाच किडनॅप करण्याचा प्लॅन आखतात. त्यानंतर काय घडतं ते या सिनेमात पहायला मिळतं.
चित्रपटाची पटकथा लिहिताना पकडवा शादी हा मूळ गाभा कुठेही भरकटणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. त्याच्या अवतीभवती गुंफलेली पटकथा चित्रपटाच्या सुरुवातीला अभय सिंगची दबंगगिरी आणि बबलीचा बिनधास्त अंदाज दाखवते. त्यानंतर नायक-नायिकेची ओळख होते आणि दोघे पहिल्याच भेटीत एकमेकांना ओळखतात याचं थोडं आश्चर्य वाटतं. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमांकुर फुलतो आणि आजच्या पिढीतील तरुणाई लग्नापूर्वी जे करते ते सारं काही दोघेही करतात. त्यानंतर मात्र 'कभी हां कभी ना'चा खेळ सुरू होतो. या प्रेमकथेत सुरुवातीला नायिकेचे पिता नकार देतात. नंतर नायिका होकार देते, तेव्हा नायक तयार नसतो आणि नायिका तयार असते तेव्हा नायक कन्फ्युज होतो.
इथपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा दोघंही तयार होतात तेव्हा नायकाचे पिता एक वेगळाच डाव रचतात. त्यामुळं चित्रपट वाढतच जातो. संकलनात कात्री लावून वेळ मर्यादा कमी करणं ही या चित्रपटाची मूळ गरज होती. मध्यंतरापूर्वी विनोदी संवाद आणि प्रसंगांच्या माध्यमातून थोडं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, पण मध्यंतरानंतर कथा दिशाहीन होते. उत्तम वातावरण निर्मिती ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. बोलीभाषेवरही विशेष मेहनत घेण्यात आली आहे. चित्रपटातील गाणीही श्रवणीय आहेत. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट सक्षम असला तरी क्लायमॅक्समधील फाईट सीन्स फारसे प्रभावी वाटत नाहीत. नवऱ्या मुलाला रेल्वे रूळावर झोपवून लग्नासाठी तयार करण्याचा सीन चांगला झाला आहे. दिग्दर्शक या नात्यानं प्रशांत सिंग यांनी थोडी आणखी मेहनत घेतली असती तर एक जबरदस्त जबरीया जोडी पहायला मिळाला असता.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि परीणीती चोप्रा यांची केमिस्ट्री या चित्रपटात तितकीशी वर्क झालेली दिसत नाही. दोघांनीही बोलीभाषा आणि देहबोलीच्या साथीनं दोघांनीही आपापल्या व्यक्तिरेखांमध्ये रंग भरण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. परीणीतीला करण्यात आलेला भडक मेकअप मात्र खटकतो. जावेद जाफरी एका वेगळ्याच स्टाईलमध्ये दिसतो, तर संजय मिश्रांनीही आपली व्यक्तिरेखा अचूक ठेका पकडत साकारली आहे. अपारशक्ती खुरानानं पुन्हा एका अफलातून बॅटिंग केली आहे. त्याच्या मुखातील एक शेर जबरदस्त आहे. नायकाची आई साकारणाऱ्या शीबा चढ्ढा यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेचा एक वेगळाच पैलू या चित्रपटात पहायला मिळतो. याखेरीज चंदन रॅाय संन्याल, नीरज सूद, रुसलान मुमताझ आदींची कामंही चांगली झाली आहेत.
दर्जा : **१/२
.................................
निर्माता : एकता कपूर, शोभा कपूर, शैलेश आर. सिंग
लेखक : संजीव के. झा
दिग्दर्शक : प्रशांत सिंग
कलाकार : सिद्धार्थ मल्होत्रा, परीणीती चोप्रा, अपारशक्ती खुराना, जावेद जाफरी, संजय मिश्रा, शीब चढ्ढा, चंदन रॅाय संन्याल, नीरज सूद, रुसलान मुमताझ, योगिता राठोड