पतंजलीच्या एका उत्पादनावर मार्च महिना चालू असताना मॅन्युफॅक्चरिंग तारीख मात्र एप्रिल महिन्याची दाखवण्यात आल्याचं निदर्शनात आलं आहे. यावरून विधान परिषदेत सदस्यांनी चांगलीच टीका केली.
यावेळी सरकारची मेहरनजर असलेलं पतंजली लोकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा दावा काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी केला. तर पतंजलीच्या उत्पादनांत भेसळ असल्याच्या विरोधकांच्या टीकेला उत्तर देतांना अन्न आणि औषध पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी या देशात कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. दोषी कुणीही असो कायद्यानुसार त्याला शिक्षा होईल, अशी ग्वाही बापट यांनी दिली. तसेच पतंजलीच्या उत्पादनांचीही पडताळणी करण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.
पाण्यापासून ते सोन्यापर्यंत कशातही भेसळ होऊ द्यायची नाही, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. अन्य राज्यात भेसळ करणाऱ्यांवर ७ वर्षांपासून ते जन्मठेपेची शिक्षा करण्याचा कायदा आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही कायदा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधान परिषदेत दिली.
भेसळखोरांवर कारवाई करण्यासाठी भारतीय दंड विधान कलम २७२ ते २७६ यांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. भेसळची पडताळणी करण्यासाठी फिरत्या प्रयोगशाळा निर्माण करण्यात येतील. यासाठी केंद्र शासनाने १६५ कोटी रुपयांचं अनुदान दिलं असून वर्ष २०१९ पर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती बापट यांनी दिली.