रिझर्व्ह बँकेनं आज द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं आहे. रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो रेट ६.५० टक्क्यांवरून ६.२५ टक्के झाला आहे. गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण समितीच्या बैठकीत ही घोषणा केली. २८ जानेवारी रोजी सरकारी बँकांसोबत झालेल्या बैठकीत गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दर कमी करण्याचे संकेत दिले होते.
आरबीआयनुसार, २०१९-२० मध्ये देशाचा जीडीपी जर ७.४ टक्के राहू शकतो. तर महागाईचा दर २०१९-२० मध्ये पहिल्या तिमाहीत ३.२ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ३.४ टक्के आणि तिसऱ्या तिमाहीत ३.८ टक्के राहू शकतो. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे बँकांचे व्याजदर घटणार आहेत. यामुळे गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेल्या कर्जांवरील व्याजदरही कमी होणार असल्यानं बँकेचा हप्ताही कमी होणार आहे.
यासोबतच आरबीआयनं शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. बिनव्याजी कर्जाच्या रकमेत सुमारे ६० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठीच्या कर्जाची मर्यादा १ लाख ६० हजार रुपये झाली आहे.