Coronavirus pandemic: दिवसभरात कोरोनाने 122 जणांचा मृत्यू, 39हजार 935 रुग्णांवर उपचार सुरू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यात आज 996 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 32 हजार 329 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या  2560 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 39 हजार  935 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 4 लाख 97  हजार 276 नमुन्यांपैकी 74 हजार 860 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 71 हजार 915 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 72 हजार 912 खाटा उपलब्ध असून सध्या 33 हजार 674 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात 122 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 71 पुरुष तर 51 महिला आहेत. आज नोंद झालेल्या 122 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 69  रुग्ण आहेत तर 46 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 7 जण 40 वर्षांखालील आहे. या 122 रुग्णांपैकी 88 जणांमध्ये ( 72 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 2587 झाली आहे. 

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 57 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित  मृत्यू हे 30 एप्रिल  ते 31 मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 65 मृत्यूंपैकी मुंबई 30, सोलापूर 10, औरंगाबाद 6, नवी मुंबई 3, धुळे 3, जळगाव 2, कोल्हापूर 2, ठाणे 2, अहमदनगर 1, अकोला 1, नंदूरबार 1, पुणे 1, उल्हासनगर 1, वसई-विरार 1अशी मृत्यूची नोंद आहे.

(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक 7 मे 2020 पासूनच्या 333 रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील 140 रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड19 बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट 3730 झोन क्रियाशील असून आज एकूण 19 हजार 019 सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी 71.61  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.  

पुढील बातमी
इतर बातम्या