राज्यभरात नव्या ५२२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळं एकूण रुग्णसंख्या ८५९० झाली आहे. सोमवारी ९४ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यभरात १२८२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६९३९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २१ हजार ५६२ नमुन्यांपैकी १ लाख २ हजार ५२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ८५९० जण पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ६७७ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ९,३९९ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात २७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३६९ झाली आहे. सोमवारी झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईचे १५, अमरावती शहरातील ६, पुणे शहरातील ४ तर जळगाव येथील १ आणि औरंगाबाद शहरातील १ रुग्ण आहे. अमरावती शहरात झालेले मृत्यू हे दिनांक २० ते २५ एप्रिल २०२० या कालावधीतील आहेत.
सोमवारी झालेल्या मृत्यूंपैकी १५ पुरुष तर १२ महिला आहेत. २७ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १३ रुग्ण आहेत तर ८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ६ रुग्ण ४० वर्षांखालील आहेत. या २७ रुग्णांपैकी २२ जणांमध्ये (८१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा तपशील