देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना, महाराष्ट्रात गुरूवारी कोरोनाचे 583 नवे रुग्ण आढळून आले आहे. गुरूवारी 180 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात कोरोनाने बाधित 8266 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर गुरूवारी कोरोना या महामारीने 27 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने बाधित रुग्णांची संख्या 10 हजार 498 इतकी आहे.
राज्यभरात कोरोनाशी दोन हात करण्यात संपूर्ण प्रशासन व्यस्त आहे. गुरूवारी दिवसभरात कोरोनाच्या 1 लाख 45 हजार 798 नमुन्यांपैकी 1 लाख 34 हजार 244 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 10 हजार 498 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 68 हजार 266 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 10 हजार 695 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर गुरूवारी या महामारीने राज्यभरात 47 जणांचा बळी घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोना या महामारीने मृत्य पावलेल्यांची संख्या आता 459 इतकी झाली आहे.
गुरूवारी मृत पावलेल्या 27 नागरिकांमध्ये मुंबईतील 20 रुग्णांचा समावेश आहे. तर पुणे शहरातील 3 आहेत. ठाणे शहरातील 2 व्यक्तीचा समावेश आहे. या शिवाय नागपूर आणि रायगड मधील 1 व्यक्तीचा समावेश आहे. मृतांमध्ये 19 पुरुष तर 8 महिला आहेत. गुरूवारी झालेल्या 27 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 14 रुग्ण आहेत तर 13 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. या 27 रुग्णांपैकी 22 जणांमध्ये (81 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.