पावसाळ्यापूर्वी मुंबई नाल्यांची आणि रस्त्यांची कामे गरजेचे असून पालिके मार्फत या साफ सफाई स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आढावा घेतला.पूर्व उपनगरातील नालेसफाईचे काम समाधानकारक सुरू असून आतापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती रस्त्यांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पूर्व उपनगरातील नालेसफाई व रस्त्यांच्या कामाची स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी नुकतीच अतिरिक्त महापालिका आयुक्त ( प्रकल्प) पी. वेलारासू यांच्यासमवेत गुरुवारी पाहणी केली. नालेसफाई व रस्ते पाहणीचा हा दुसरा दौरा असून कामे व्यवस्थितरित्या व्हावी यासाठी ही पाहणी करत असल्याचे जाधव यांनी सांगितले. नालेसफाई व रस्त्यांची कामे २४ तासही गतीने पूर्ण करण्यात येत आहेत. लाँकडाऊनमुळे रस्त्यावरील जंक्शनची कामे गतीने पूर्ण करण्यात येत आहेत.
या पाहणी दौऱ्यात कुर्ला (पश्चिम) च्या एलबीएस मार्गावरील शितल सिनेमा येथून ते एलबीएस मार्गावर पाणी भरणाऱ्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. यामध्ये शितल सिनेमा, संजय नगर पोलीस चौकी, कुर्ला (पश्चिम), महेंद्र पार्क जंक्शन, घाटकोपर, साईसृष्टी बिल्डिंगजवळील आंबेवाडी जंक्शन, चेंबूरमधील आर. सी. मार्ग, इंदिरानगर याठिकाणची पाहणी करण्यात आली. काही ठिकाणी छोटे कलव्हट तयार करून पाणी वाहून येणाऱ्या मुख्य पर्जन्य जलवाहिनीला जोडण्यात आली आहेत. यामुळे पावसाचे पाणी तुंबून न राहता या पाण्याचा निचरा होण्यास मोठा हातभार लागणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
सायन स्टेशन ते चेकनाका पर्यंत संपूर्ण २१ किलोमीटरच्या एलबीएस मार्गाचे रुंदीकरण करण्यात येत असून विविध विभागांतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची सुद्धा स्थायी समिती अध्यक्षांनी यावेळी पाहणी केली. या मार्गावर येणारे अतिक्रमणे काढून हा मार्ग रुंदीकरण करण्यात येत आहे. शंभर फुटाच्या या मार्गावर पदपथाची कामे चांगले रितीने पूर्ण करून हा रस्ता गतीने पूर्ण करण्याची सूचना स्थायी समिती अध्यक्षांनी रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तर पूर्व द्रुतगती महामार्गावरील लक्ष्मीबाग नाल्याची पाहणी करताना, या नाल्यामधून आतापर्यंत किती गाळ काढण्यात आला आहे याची माहिती घेऊन उर्वरित काम निर्धारित वेळेत पूर्ण करणार असल्याची माहिती घेतल. त्याचबरोबर मानखुर्द मधील सुभाष नगर येथील नाल्याचीही पाहणी केली. हा नाला खाडीला जाऊन मिळत असल्यामुळे भरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात नाल्यांमध्ये तरंगता कचरा वाहून येत असल्याचे नगरसेवक परमेश्वर कदम यांनी सांगितले. याबाबत खाडीच्या मुखाशी संरक्षक जाळी बसवावी, जेणेकरून हा कचरा नाल्यामध्ये वाहून येणार नाही, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्षांनी यावेळी पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
त्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांनी २.१ किलोमीटरच्या घाटकोपर -मानखुर्द लिंक रोड उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी केली. तीन लेन असलेला उड्डाणपूल बृहन्मुंबई महानगरपालिका प्रथमच बांधत असून २०२१ पर्यंत या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्थायी समिती अध्यक्षांना यावेळी सांगितले.