पालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) व्यावसायिक आस्थापनांसाठी अग्निसुरक्षा नियम अधिक कडक केले आहेत. दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील लागलेल्या भीषण आगीत 21 जणांचा मृत्यू झाल्यानंतर बीएमसीने हा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी अग्निसुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी व्यावसायिक आस्थापनांना 120 दिवसांची मुदत दिली जात होती. मात्र आता हॉटेल, रेस्टॉरंट, बार आणि बँक्वेट हॉलना अग्निसुरक्षा यंत्रणांतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी फक्त दोन आठवड्यांपासून एका महिन्यापर्यंतची मुदत दिली जाणार आहे.
अग्निशमन दलाने (Mumbai Fire Brigade) शहरभर तपास अधिक तीव्र केला आहे. जानेवारी 2026 पासून आतापर्यंत 428 हॉटेल, रेस्टॉरंट, बार आणि पार्टी हॉलची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 17 आस्थापनांमध्ये आवश्यक अग्निसुरक्षा उपकरणांचा अभाव किंवा उपकरणे बंद अवस्थेत आढळून आल्याने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
तुलनेत, 2025 या संपूर्ण वर्षात 2,721 आस्थापनांची तपासणी करून 22 ठिकाणी कारवाई करण्यात आली होती.
व्यावसायिक स्वयंपाकघरांमध्ये अनधिकृत एलपीजी सिलिंडरच्या वापरावरही कारवाई वाढवण्यात आली आहे. 2025 मध्ये अग्निशमन विभागाने हॉटेल आणि रेस्टॉरंटमधून 190 बेकायदेशीर सिलिंडर जप्त केले होते. तर 2026 च्या सुरुवातीच्या काही महिन्यांतच आणखी 58 सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.
Maharashtra Fire Service कायद्यानुसार, सुधारित मुदतीत अग्निसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांचे वीज आणि पाणीपुरवठ्यासारख्या अत्यावश्यक सेवा बंद केल्या जाऊ शकतात. त्यामुळे संबंधित व्यवसायांना कामकाज थांबवावे लागू शकते.
मुंबईत अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि व्यावसायिक आस्थापनांनी कायमस्वरूपी कार्यरत अग्निसुरक्षा व्यवस्था ठेवावी यासाठी बीएमसीने ही कडक पावले उचलली आहेत.
हेही वाचा