पवई तलावाजवळील सायकल ट्रॅक प्रकल्पाला हायकोर्टाची स्थगिती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पवई तलावानजीक उभारण्यात येणाऱ्या सायकल ट्रॅक प्रकल्पाच्या कामाला दिलेली स्थगिती हायकोर्टानं ३१ जानेवारीपर्यंत कायम ठेवली आहे.

पालिका आणि राज्य सरकारला उत्तर देण्यासाठी आणखीन वेळ हवा असल्याचं मंगळवारी कोर्टाला कळवण्यात आलं. त्यानंतर हायकोर्टानं ही सुनावणी १३ डिसेंबरपर्यंत तहकूब केली.

या प्रकल्पाविरोधात आयआयटी पवईतील २ विद्यार्थ्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ज्यावर मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यापुढे सुनावणी झाली.

मुंबई पालिकेमार्फत पवई तलाव परिसराचा विकास करण्यात येणार आहे. तलावालगत सायकल, जॉगिंग ट्रॅक आणि तलावाचं सुशोभीकरण केलं जाणार आहे. या कामाला सुरुवातही करण्यात आली होती. मात्र हा ट्रॅक खारफुटीच्या जागेवर बांधण्यात येत असून त्यासाठी तलावात भराव टाकला जाणार आहे.

तसंच या कामात इथली काही झाडंही तोडली जाणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होईल, असा दावा करत ओमकार सुपेकर आणि अभिषेक त्रिपाठी या पीएचडी करणाऱ्या आयआयटीतील दोघा विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

याचिकाकर्त्यांचा दावा आहे की, पवई तलावानजीक अनेक मोठी झाडं आहेत. याशिवाय तिथं विविध प्रजातीचे प्राणी आणि पक्षीही आहेत. याशिवाय तलावात मगर, कासव आणि विविध जलचरांचही अस्तित्वात आहे. सायकल ट्रॅकमुळे या नैसर्गिक संपत्तीला हानी पोहचून जनावरांच्या नैसर्गिक अधिवासावर गदा येऊ शकते.

पालिकेनं हायकोर्टाला सांगितलं की, सदर जागा ही मुळात खारफुटीचीच नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन कोर्टानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत या कामाला १८ नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिली होती, जी आता थेट अडीच महिन्यांनी वाढवली आहे.


हेही वाचा

दक्षिण मुंबईची हवा दिल्लीपेक्षा जास्त विषारी

राणीच्या बागेतील पेंग्विनच्या खर्चात पुन्हा होणार वाढ

पुढील बातमी
इतर बातम्या