यूपीतल्या लोकांची खाण्यापिण्याची व्यवस्था करा, आम्ही खर्च देऊ, योगी आदित्यनाथ यांची उद्धव ठाकरेंना विनंती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

उत्तर प्रदेशहून (uttar pradesh) कामाधंद्यानिमित्त महाराष्ट्रात आलेल्या आणि संचारबंदीमुळे इथंच अडकून पडलेल्या नागरिकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करा, त्यांचा संपूर्ण खर्च आम्ही देऊ, अशी विनंती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना केली आहे. 

कोरोना व्हायरसचा (coronavirus) प्रसार होऊ नये म्हणून संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. विमान, रेल्वे, बस सेवा ही देशातील सार्वजनिक दळणवळणाची प्रमुख साधने सध्या कोरोनामुळे (covid-19) १४ एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या कारणांनी इतर राज्यांत गेलेले व्यक्ती आहे, त्या ठिकाणीच अडकून पडले आहेत. हीच परिस्थिती उत्तर प्रदेशातील नागरिकांचीही झाली आहे. महाराष्ट्रात लाॅकडाऊन (lockdown) झाल्याने कंपन्या, इतर व्यवहार बंद झालेत. यामुळे उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर राज्यांतून आलेल्या तसंच हातावर पोट असलेल्या लोकांची उपासमार होऊ लागली आहे. त्यामुळे परप्रांतीय  मिळेल त्या साधनांनी आपल्या गावांकडे निघाले होते. पण संचारबंदीमुळे मध्येच अडकले.

शिवडीतून ४० जणांना उत्तर प्रदेशला घेऊन जाणारा एक ट्रक नुकताच कसारा इथं पकडण्यात आला. या ट्रकमधील परप्रांतीय कोरोनाच्या भीतीने महाराष्ट्र सोडून पळत होते. ट्रकमध्ये भाजीपाला आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण पोलिसांनी हा ट्रक कसारा इथं अडवून त्यांना पुन्हा मुंबईला पाठवलं.

या सर्व कारणांची दखल घेत योगी आदित्यनाथ यांनी १२ राज्यांसाठी प्रभारी नियुक्त केले आहेत. या १२ राज्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशातील नागरिकांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था हे प्रभारी बघणार आहेत. त्याचा रिपोर्ट हे प्रभारी आदित्यनाथ यांना देतील.  

पुढील बातमी
इतर बातम्या