केवळ सौंदर्यीकरण; बंदी कायम
ऑगस्ट 2025 मध्ये राज्य सरकारच्या आदेशानुसार मुंबईतील 51 कबुतरखाने बंद करण्यात आले होते. त्यावेळी दादर कबुतरखान्यातील अन्न देखील जप्त करण्यात आले होते.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, हा प्रस्ताव फक्त परिसराचे सौंदर्य वाढवण्यासाठी असून, कबुतरांना दाणा टाकण्यावरील बंदी कायम राहणार आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दादर कबुतरखान्याची वास्तू वारसा (हेरिटेज) दर्जाची असल्याने ती अन्यत्र हलविणे शक्य नाही.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे आमदार महेश सावंत यांनी दादरमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कबुतरखाना हटविण्याची मागणी केली होती.
स्थानिक रहिवाशांनी ताडपत्री काढण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असले तरी कबुतरांना अन्न टाकण्यावरील बंदी कायम ठेवावी, अशी भूमिका मांडली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील रहिवासी कबुतरांच्या विष्ठा, पिसे आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या श्वसनविकार आणि अस्वच्छतेबाबत तक्रारी करत होते. अनेकांनी कबुतरांपासून संरक्षणासाठी घरांच्या खिडक्यांना जाळ्याही बसवल्या आहेत.
स्थानिक नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा देत, सध्या लावलेली ताडपत्री या ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य कमी करत असल्याचे सांगितले.
महापालिकेच्या या प्रस्तावामुळे दादर कबुतरखान्याचा ऐतिहासिक वारसा जपत त्याचे सौंदर्य अधिक खुलविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.