मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व महापालिकेनं नियमावली जारी केली आहे. शिवाय, गर्दी न करण्याचं आवाहन ही करण्यात आलं आहे. मात्र, तरीही लोक गेल्या अनेक दिवसांपासून सतत दादरच्या भाजी मंडईमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. त्यामुळं पालकमंत्री अस्लम शेख यांनी दादर भाजी मंडईतील विक्रेत्यांशी संवाद साधला.
दादर मंडईतील विक्रेत्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांना माहिती देताना, 'लोकांनी मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केलं पाहिजे अन्यथा सरकारला कठोर उपाययोजना कराव्या लागतील', असं पालखमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं, शिवाय, मास्क घालण्याचंही आवाहन त्यांनी केलं आहे.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असली तरी सोमवारी ५ एप्रिल रोजी सकाळी मुंबईतील दादर भाजी मंडईमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली. बाजारपेठेतील लोक सामाजिक अंतरांच्या नियमांचं पालन न करताना दिसले आणि बर्याच जणांनी मास्कही घातला नव्हता.
मुंबईमधील रुग्णवाढीनं रविवारी नवा उच्चांक गाठला असून रविवारी तब्बल ११ हजार १६३ मुंबईकरांना कोरोनाची बाधा झाली. तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील रुग्ण वाढीचा दर १.६१ टक्क्यांवर पोहोचला असून रुग्णदुपटीच्या कालावधीत कमालीची घसरण झाली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या शोधार्थ महापालिकेनं रविवारी ५१ हजारांहून अधिक चाचण्या केल्या. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कोरोनाबधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळं राज्य सरकार, महापालिका आणि अन्य यंत्रणांनी कोरोना संसर्गाविरोधात पुन्हा एकदा कंबर कसली आहे. रविवारी मुंबईतील ११ हजार १६३ जणांना बाधा झाल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या चार लाख ५२ हजार ४४५ वर पोहोचली आहे.