रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे, केडीएमसी प्रशासनाचा निर्णय

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महापालिका (केडीएमसी) प्रशासनाने घेतला आहे. शहर कचरामुक्त करण्यासाठी केडीएमसी प्रशासन शून्य कचरा मोहीम राबवत आहे. यासाठी पालिकेने नागरिकांमध्ये जनजागृतीही केली आहे.

अनेक रहिवाशी मात्र रस्त्यावर कचरा फेकून या मोहिमेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा नागरिकांवर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करून तेथून त्यांना न्यायालयात समज देण्यासाठी हजर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या १५ रहिवाशांवर घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे. कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांना मिळाली होती. पहाटेच्या वेळेत या भागात कर्मचाऱ्यांनी पाळत ठेवून कचरा रस्त्यावर फेकणाऱ्या तीन रहिवाशांना पकडले.  त्यांची रवानगी कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात केली. तेथे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात समज देण्यासाठी हजर करण्याची प्रक्रिया केली. 

कचऱ्याच्या संदर्भात बेशिस्त वागणाऱ्या रहिवाशांना अद्दल घडावी यासाठी प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे, असे घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले. 

पुढील बातमी
इतर बातम्या