नवी मुंबईहून कोल्हापूरसाठी इंडिगोची विमानसेवा सुरू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोल्हापूरच्या (kolhapur) हवाई सेवेला आणखी बळ मिळाले असून धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नांतून इंडिगो एअरलाईन्सची कोल्हापूर-नवी मुंबई (navi mumbai) -कोल्हापूर ही नवी विमानसेवा रविवारपासून सुरू झाली आहे.

दिवसातून दोन वेळा उपलब्ध होणाऱ्या या सेवेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या उड्डाण योजनेअंतर्गत देशातील शहरांना हवाई सेवेद्वारे जोडण्याच्या उपक्रमात कोल्हापूरचाही समावेश झाला आहे.

कोल्हापूर विमानतळाचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण सातत्याने सुरू आहे. तसेच विविध शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढत आहे.

या नव्या विमानसेवेचा शुभारंभ खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. सकाळी साडेनऊ वाजता कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

या शुभारंभ प्रसंगी कोल्हापूर विमानतळ संचालक अनिल शिंदे, अधिकारी अनिल श्रीवास्तव, राजेश अहिरवार, बेनू नायक, अंकित व्यास, रविराज लामकाने, राजेश पेडणेकर तसेच इंडिगो एअरलाईन्सचे अधिकारी उपस्थित होते.

या सेवेअंतर्गत इंडिगोचे (indigo) विमान दररोज सकाळी 8 वाजता नवी मुंबईहून उड्डाण करून 9:15 वाजता कोल्हापुरात दाखल होईल.

तसेच त्यानंतर 9:35 वाजता कोल्हापूरहून नवी मुंबईकडे उड्डाण करून 10:25 वाजता पोहोचेल. सायंकाळी 7:20 वाजता नवी मुंबईहून सुटणारे विमान 8:30 वाजता कोल्हापुरात येईल. तसेच 8:50 वाजता परतीचे उड्डाण घेऊन 10:35 वाजता नवी मुंबईत पोहोचेल.

पहिल्याच दिवशी 67 प्रवासी कोल्हापुरात दाखल झाले, तर 65 प्रवासी मुंबईकडे रवाना झाले. या नव्या सेवेमुळे मुंबईतील कामे आटोपून अवघ्या तासाभरात कोल्हापुरात परत येण्याची सुविधा उपलब्ध झाली असून प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.


हेही वाचा

बीकेसीत 600 कोटींच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाची योजना

महाराष्ट्रात नवीन वीज दर लागू होणार

पुढील बातमी
इतर बातम्या