माळशेज घाटात बोगद्याजवळ दरड कोसळल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणए बंद करण्यात आली आहे. सध्या येथे दरड हटवण्याचं काम सुरू आहे. पण धुके आणि पावसामुळे कामात अडथळे येत असल्याचं सांगण्यात येत आहे.
कल्याण-अहमदनगर महामार्गावर जवळपास १० किलोमीटर अंतरात माळशेज घाट आहे. माळशेज घाटातील छत्री पॉईंट येथे ही दरड कोसळली. खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक पुणे आणि नाशिकच्या दिशेने वळवण्यात आली आहे. महामार्ग अधिकारी कर्मचारी आणि महसूल कर्मचारी, पोलिस हे घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या घाटात धुके असून त्याचा अंदाज घेत दरड हटवण्याचं काम सुरू आहे.
दरड कोसळल्यानं एका ट्रकचा चक्काचूर झाल्याची माहिती समोर आली आहे, तर एसटी बस थोडक्यात बचावली. या अपघातात काही जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर पावसामुळे रस्त्यावर दगड, मातीचा खच साचला असून तो हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.