राज्यात पुढच्या २ दिवसांत लॉकडाऊन लागण्याचे संकेत

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सध्या लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला. याबरोबरच सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारच्या निर्णयाला सहमती दर्शवली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असले तरी ती तातडीने लागू केली जाणार नाही. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता २ आठवड्यांच्या कडक लॉकाडऊनची शिफारस तज्ज्ञ डॉक्टरांच्या कृती दलानं केल्यानं लॉकडाऊनबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला असून, येत्या २-३ दिवसांत लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाण्याची चिन्हं आहेत.

राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचे संकेत शनिवारी देण्यात आले होते. परंतु, लगेचच सोमवारपासून लॉकाडाऊन लागू केला जाणार नाही. सामान्य जनतेला २-३ दिवसांचा अवधी द्यावा, अशी सूचना सर्वच राजकीय नेते व व्यापारी संघटनांनी केली होती. त्यानुसार पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनंतरच लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारच्या बैठकीत तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेल्या कृती दलाच्या सदस्यांशी चर्चा केली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी २ आठवड्यांचा लॉकडाऊन करावा, असं मत तज्ज्ञांनी मांडलं. ऑक्सीजन उपलब्धता, रेमडेसिवीरचा वापर, खाटांची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही आदी मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. कृती गटाचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ. उडवाडिया, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. राहुल पंडित, डॉ. झहीर विराणी, डॉ. ओम श्रीवास्तव, डॉ. तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव विजय सौरव आदी सहभागी झाले होते.

सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर राज्यात लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लशींचा पुरवठा व्हावा, अशी विनंती पुन्हा पंतप्रधानांना करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. लसीकरणात पुढे असलो तरी आणखी गती वाढवू आणि जास्तीत जास्त जणांना लस देऊ. हे लसीकरण आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी उपयुक्त ठरेल. आता या क्षणी असलेल्या लाटेला थांबविण्यासाठी आपल्याला काही काळासाठी का होईना, कडक निर्बंध लावावेच लागतील, असे सूतोवाच ठाकरे यांनी केलं.

मार्गदर्शक तत्त्वांबाबत आदेश

  • लॉकडाऊन लागू करण्याच्या दृष्टीनं सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
  • कोणत्या वर्गाला कशी मदत करता येईल, याचीही माहिती घेतली जात आहे. 
  • या संदर्भात मुख्यमंत्री वित्त विभागाशी चर्चा करणार आहेत.
  • लॉकडाऊनमध्ये हाल होऊ नयेत, यासाठी गरजूंना मदत करण्याची मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षांतील नेत्यांनी केली होती.
पुढील बातमी
इतर बातम्या