दुकाने, उपाहारगृहांची वेळमर्यादा वाढविण्याबाबत लवकरच निर्णय

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शाळा, महाविद्यालये, चित्रपट तसेच नाट्यगृहे खुली करण्यास सरकारनं परवानगी दिली आहे. दिवाळीपर्यंत खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता दुकानं, मॉलच्या वेळेतही वाढ करण्याबाबत सरकारच्या पातळीवर विचारविनिमय झाला. या पार्श्वभूमीवर दुकानं, उपाहारगृहे, मॉलवरील निर्बंध आता मागे घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानं दिवाळीच्या तोंडावर निर्बंध आणखी शिथिल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सर्व प्रकारची दुकाने, उपाहारगृहे, मॉलच्या वेळमर्यादेत वाढ करण्यात येणार असून, याबाबतचा आदेश येत्या काही दिवसांत प्रसृत करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या सर्व व्यापारी दुकाने, बार, उपाहारगृहे, मॉल रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. उपाहारगृहांमध्ये एकूण क्षमतेच्या ५० टक्के इतक्याच ग्राहकांना प्रवेशास मुभा आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हे निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी व्यापारी तसेच उपाहारगृहांच्या मालकांकडून करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या मंत्र्यांच्या गेल्या आठवडय़ात झालेल्या बैठकीतही वेळमर्यादा शिथिल करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विशेषत: उपाहारगृहांना रात्री १० पर्यंतच मुभा असल्याने रात्री उशिरा बाहेर पडणाऱ्यांचे हाल होतात. त्यामुळे उपाहारगृहे व बारमालकांकडून वेळेची मर्यादा वाढवून देण्याची मागणी करण्यात येत होती.

बंद सभागृहातील २०० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा आता उठविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता लशीची एक मात्रा घेतलेल्यांना आणि आरोग्यसेतू अ‍ॅपवर आरोग्य स्थिती चांगली असलेल्यांना मॉलमध्ये जाण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या