आगामी 24 तासांत कोकण आणि विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्याची राजधानी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश सामान्यतः ढगाळ असेल. अधूनमधून हलक्या सरींचा शिडकावा होण्याची शक्यता आहे.
वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता मुंबईत आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये आकाश सामान्यतः ढगाळ राहणार असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर यासह इतर सर्व जिल्ह्यांमध्येही हवामान विभागाने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या वादळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या मात्र पावसाने विश्रांती घेतली असून आज कोणताही मोठा अलर्ट नाही. काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असली, तरीही राज्यात कोठेही जोरदार पावसाची शक्यता नाही.
दरम्यान, विदर्भातील पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता कायम आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि अमरावती या सहा जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा