दिलासादायक! कोरोनाच्या दैनंदिन मृत्युसंख्येत मोठी घट

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यात कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत चालली आहे. शिवाय मृत्यूची संख्याही कमी झाली आहे. तसेच रविवारच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील घटल्याने राज्यातील कोरोना संसर्गाची सोमवारची स्थिती तुलनेने दिलासादायक आहे. तर दिवसभरात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत किंचित घट झालेली असली तरी राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्येत घट झाली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दिवसभरात राज्यात २ हजार ५८३ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारी ही संख्या ३ हजार ४१३ इतकी होती. तर सोमवारी दिवसभरात एकूण ३ हजार ८३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ८ हजार ३२६ इतकी होती. तर, आज २८ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ४९ इतकी होती.

राज्यात झालेल्या २८ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ४० हजार ७२३ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१८ टक्के इतके झाले आहे.

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४१ हजार ६७२ इतकी आहे. काल ही संख्या ४२ हजार ९९५ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ११ हजार १९३ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र ही संख्या ५ हजार ७४८ आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ३ हजार ००२ वर गेला आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ५ हजार ५५१ अशी आहे. तर, सांगलीत एकूण १ हजार ७३२ अशी वाढली आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या २ हजार ३४७ इतकी किंचित वाढली आहे.

मुंबईत उपचार घेत आहेत ५,१०९ रुग्ण

मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ५ हजार १०९ इतकी आहे. तर, रत्नागिरीत ६६३ इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ७६९, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ९२९ इतकी आहे

धुळे, वाशिम जिल्ह्यात एक सक्रिय रुग्ण

या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४१९, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ११५ इतकी वाढली आहे. अमरावतीत ही संख्या ९५ वर आली आहे. तर नंदुरबारमध्ये राज्यात सर्वात कमी फक्त १ सक्रिय रुग्ण आहे.

२,७५,७३६ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ७१ लाख ६४ हजार ४०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख २४ हजार ४९८ (११.४१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ७५ हजार ७३६ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ६७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या