JNPA प्रकल्पासाठी जमीन, घरे आणि पारंपरिक उपजीविका गमावूनही अद्याप योग्य पुनर्वसन झाले नसल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी सकाळी 8 वाजल्यापासून JNPA प्रशासकीय इमारतीबाहेर उपोषण करण्यात येणार आहे.
या आंदोलनाचा निर्णय रविवारी, 9 ऑगस्ट रोजी नावा शेवा येथील श्री शांतैश्वरी मंदिरात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
वर्षानुवर्षे आश्वासने मिळूनही ठोस तोडगा न निघाल्याने आता संयम संपला असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांकडूनही पाठिंबा मिळत असून शिवसेना, भाजप, काँग्रेससह इतर पक्षांचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते उपोषणात सहभागी होण्याची शक्यता आहे.
“भारताला स्वातंत्र्य मिळून 79 वर्षे झाली, मग आमचे पुनर्वसन अजूनही का रखडले आहे?” असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
मोठ्या संख्येने नागरिकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या:
पुनर्वसनासंदर्भातील दोन वादग्रस्त आदेश रद्द करावेत
JNPA प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांना न्याय द्यावा
सर्व बाधित ग्रामस्थांचे पूर्ण पुनर्वसन करावे
चुकीचे आणि बनावट असल्याचा आरोप असलेले आदेश रद्द करावेत
JNPA प्रकल्पामुळे बाधित झालेल्या ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न जवळपास 40 वर्षांपासून प्रलंबित असल्याचा दावा करण्यात येत आहे.
त्यामुळे स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या या सर्वपक्षीय उपोषणामुळे JNPA प्रशासन आणि संबंधित सरकारी यंत्रणांवर पुन्हा एकदा दबाव वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा