दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात. या खड्ड्यांमध्ये पडून अनेकांना जीव गमवावं लागतं. हे घडत असताना मुंबई महापालिका मात्र काहीच करताना दिसत नाही. पण मुंबईत राहणाऱ्या दादाराव बिल्होर यांनी मुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले खड्डे बुजवण्याचा निर्धार केला होता.
तीन वर्षांपूर्वी याच खड्ड्यामुळे बिल्हारे यांच्या 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. आता त्यांनी आपल्या मुलाच्या पुण्यतीथीला तो खड्डा भरण्याचा निर्णय घेतलाय, ज्या खड्ड्यात पडून त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. इतकंच नाही तर मागील तीन वर्षांत त्यांनी 550 हून अधिक खड्डे बुजवले आहेत.
दादाराव यांचे नातेवाईकसुद्धा खड्ड्यात पडून जखमी झाले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दादाराव म्हणतात, प्रशासन फक्त तेव्हाच जागी होते जेव्हा कोणती मोठी घटना घडते. मात्र कोणती दुर्घटना होईपर्यंत वाट का पाहायची? त्यापूर्वी का पावलं उचलली जात नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईतील रस्त्यांवरी खड्डे बुजवण्यासाठी इमारतीचं बांधकाम होत असलेल्या ठिकाणच्या साहित्याचा वापर करत असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय इमारतींचं बांधकाम झाल्यानंतर राहिलेला राडारोडा फेकू नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर मी नेहमी खड्डे भरायचं काम करत आहे. २९ जुलै रोजी मी १०० खड्डे बुजवण्याचा निर्धार केला होता. त्यावेळी मला एका स्वयंसेवी संस्थेनेही मदत केली. त्यात मला माझा मित्र आणि त्यांच्या मुलांनीही मदत केली. खड्डे भराण्याचं कार्य हे फक्त माझ्यापर्यंत मर्यादित न राहता प्रत्येकाने ते काम हाती घेत आपापल्या परिसरात खड्डे बुजवले पाहिजेत.
- दादाराव बिल्होर