दिलासादायक! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुंबईला धोका नाही!

(Representational Image)
(Representational Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला तरी, तिसऱ्या लाट येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अखेर महापालिकेनं मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नसून ती सुरक्षित असल्याचे स्पष्ट केलं. याबाबत सोमवारी उच्च न्यायालयाला पालिकेतर्फे सांगण्यात आलं.

मुंबईत ४२ लाख नागरिकांनी कोरोनावरील लशीच्या दोन्ही मात्रा, तर ८२ लाख नागरिकांनी एक मात्रा घेतली आहे. शिवाय लसीकरण मोहीम योग्य प्रकारे सुरू असून लशींचा तुडवडाही नाही. ही स्थिती लक्षात घेता मुंबईला करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नसून ती सुरक्षित असल्याचे पालिकेतर्फे सोमवारी उच्च न्यायालयाला सांगण्यात आले.

अंथरुणाला खिळलेल्या, अपंग तसंच, आजारी नागरिकांचं घरी जाऊन लसीकरण करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी मुंबईतील कोरोनास्थितीची, लसीकरण मोहिमेची महापालिकेतर्फे अ‍ॅड्. अनिल साखरे यांनी न्यायालयाला माहिती दिली.

त्यावेळी मुंबईतील कोरोनावरील लशीची पहिली व दुसरी मात्रा घेतलेल्या नागरिकांची आकडेवारी सादर करण्यात आली. ही आकडेवारी लक्षात घेता मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नसल्याचं व मुंबई सुरक्षित असल्याचं त्यांनी न्यायालयाला सांगितलं. तसंच, ही याचिका प्रलंबित ठेवण्याची गरज नसल्याचा दावाही केला.

याचिकाकर्त्यांनीही महापालिकेच्या दाव्याला दुजोरा दिला. लसीकरण मोहीम योग्यरीतीनं सुरू असल्याचं सांगितलं. शिवाय घरोघरी लसीकरण मोहिमेला आधी नकार देणाऱ्या केंद्र सरकारनंही आता त्याबाबत धोरण आखल्याचं न्यायालयाला सांगितलं. त्यावर अंथरुणाला खिळलेले, आजारी आणि अपंग नागरिकही लसीकरणापासून वंचित राहणार नाहीत, असे नमूद करत न्यायालयाने याचिका निकाली काढली.

पुढील बातमी
इतर बातम्या