मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण झाले आहे. येत्या दोन दिवसात उर्वरित सर्व कामं पूर्ण होतील, अशी माहिती समोर आलीय.
वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून लवकरच विक्रोळी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आलीय.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाच्या समन्वयाने विक्रोळी पुलाची उभारणी, स्थापत्य कामे आणि अनुषंगिक कामांची कालमर्यादा 31 मे 2025पर्यंत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी निश्चित केली होती. या अनुषंगाने विहित कालावधीत पुलाची सर्व मुख्य कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलामुळे पूर्व-पश्चिम बाजू जोडली जाणार आहे. या पुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पूर्व परिसरातील पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहेत. प्रवास वेळेत सुमारे 30 मिनिटांची बचत होणार आहे.
विक्रोळी रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या पुलाची एकूण रुंदी 12 मीटर तर लांबी 615 मीटर इतकी आहे. त्यापैकी 565 मीटरची उभारणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली आहे. तसेच उर्वरित 50 मीटर लांबीपर्यंतची उभारणी मध्ये रेल्वेकडून करण्यात आलीय.
रेल्वे विभागाकडून एकूण सात तुळ्या स्थापित करण्यात आल्या असून त्यांचे एकूण वजन 655 टन इतके आहे. या पुलावर महानगरपालिकेने टाकलेल्या तुळया सुमारे 2142 टन इतक्या वजनाच्या आहेत. तसेच या तुळयांची लांबी 24 ते 30 मीटर इतकी आहे. पुलाच्या तीन टप्प्यांत एकूण 18 तुळया टाकण्यात आल्या आहेत.
हेही वाचा