मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. यासोबतच राष्ट्रीय उद्यान परिसरात जागतिक दर्जाचे विद्यापीठ उभारण्याचाही प्रस्ताव समोर आला आहे. या मुद्द्यावर आता पर्यावरण आणि वनसंवर्धनाबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयाकडून हा प्रस्ताव राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव (वन) यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. उद्यानाचे नामांतर हा सरकारच्या धोरणात्मक निर्णयाचा विषय असल्याचे सांगितले जात आहे. तरी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षित क्षेत्रात विद्यापीठ उभारण्यास वन विभागातील अधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे.
वन अधिकाऱ्यांच्या मते, मोठ्या प्रमाणावर बांधकाम, वाहतूक सुविधा, वाढती मानवी वर्दळ आणि संस्थात्मक विकासामुळे वन्यजीवांच्या अधिवासावर गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे मुंबईच्या महत्त्वाच्या हरित क्षेत्रातील पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी असेही स्पष्ट केले की, राष्ट्रीय उद्यान परिसरात अशा प्रकारचे विकासकाम केल्यास वन्यजीव संरक्षण कायदा आणि वनसंवर्धन कायद्यांतील तरतुदींचे उल्लंघन होऊ शकते.
दरम्यान, या प्रस्तावामुळे नागरिकांमध्येही चर्चा सुरू झाली आहे. काही नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा उपस्थित केला असून, सार्वजनिक स्थळांना राजकीय नेत्यांची नावे देण्याच्या वाढत्या प्रवृत्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
हेही वाचा