सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये विमानतळाच्या बॅगेज हँडलिंग विभागात पाणी गळत असल्याचे दिसून आले. विमानातून टर्मिनलपर्यंत सामान पोहोचविणाऱ्या या विभागातील गळतीमुळे प्रवासी आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली.
मात्र, विमानतळ प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण देताना ही गळती कोणत्याही संरचनात्मक दोषामुळे नसून वातानुकूलन (एअर कंडिशनिंग) यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे सांगितले. संबंधित समस्या तात्काळ दुरुस्त करण्यात आली आहे. विमानतळाच्या कामकाजावर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
मुंबई महानगर प्रदेशासाठी दुसरे प्रमुख विमानतळ म्हणून विकसित करण्यात आलेले हे विमानतळ मुंबईतील विमानतळावरील ताण कमी करण्यासोबतच नवी मुंबई आणि पनवेल परिसराला आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर विकसित करण्यात आला आहे. Adani Airport Holdings Ltd कडे 74 टक्के तर CIDCO कडे 26 टक्के हिस्सा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर विमानतळाच्या पहिल्या टर्मिनलचे उद्घाटन केले होते.
सध्या या विमानतळावरून देशांतर्गत उड्डाणे सुरू असून दररोज सुमारे 20 हजार प्रवासी सेवा घेत आहेत. विमानतळ प्रशासनाच्या अंदाजानुसार, वर्षअखेरीस ही संख्या 50 हजार प्रवाशांपर्यंत पोहोचू शकते. तसेच विमानांची दैनंदिन ये-जा सध्याच्या 150 वरून जवळपास 380 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ॲप-आधारित टॅक्सी चालकांच्या आंदोलनामुळेही विमानतळावरील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता गळतीची घटना समोर आल्याने नव्या विमानतळाच्या देखभाल आणि गुणवत्ता नियंत्रणाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
विमानतळ प्रशासनाच्या माहितीनुसार, बुधवारी बॅगेज बेल्टच्या वर असलेल्या वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ही गळती झाली होती. समस्या त्वरित सोडविण्यात आली असून उड्डाणे, सामान हाताळणी सेवा किंवा प्रवाशांच्या सुविधांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तथापि, नव्याने सुरू झालेल्या आणि मोठ्या सार्वजनिक गुंतवणुकीतून उभारलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या गुणवत्ता नियंत्रण व देखभाल व्यवस्थेबाबत ही घटना पुन्हा एकदा प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे.
हेही वाचा