मुंबईत अवजड वाहनांना सकाळ-संध्याकाळ नो एन्ट्री

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - मुंबई आणि वाहतूक कोंडी हे जणू समीकरणच. या डोकेदुखीतून मार्ग काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नवा फंडा आणला आहे. यापुढे सकाळ आणि संध्याकाळी मुंबईत अवजड वाहनांना नो एण्ट्री असेल. या आधीही असा प्रयोग मुंबईत राबवण्यात आला होता, मात्र तो म्हणावा तसा यशस्वी झाला नव्हता.

मुंबईत वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत असून ठिकठिकाणी रस्ता दुरुस्तीची कामं सुरू आहेत. मेट्रो प्रकल्प तसंच वीज आणि दूरध्वनी कंपन्यांचीही विविध कामं सुरू आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी वाहतुकीत अडथळे येतात. ही कोंडी सोडवण्यासाठी सकाळ-संध्याकाळी अवजड वाहनांना मुंबईत नो एन्ट्री करण्यात आल्याचं अपर पोलीस आयुक्त संजय मोहिते यांनी पत्रकात स्पष्ट केलंय.

अत्यावश्यक सेवांना सूट

अत्यावश्यक सेवा पुरवणारी अवजड वाहनं, भाजीपाला, दूध, रुग्णवाहिका, पोलीस, अग्निशमन दल तसंच शासकीय आणि निमशासकीय वाहनांना या आदेशातून वगळण्यात आलंय. या वाहनांसह प्रवासी वाहतूक करणार्‍या बसनाही यातून वगळण्यात आलंय.

कधी असेल अवजड वाहनांना बंदी?

सकाळी - ७ ते ११

संध्याकाळी - ५ ते रात्री ९

पुढील बातमी
इतर बातम्या