उष्णतेच्या लाटेची पूर्वसूचना असल्यास लोडशेडिंग न करण्याचे आदेश

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

उष्णतेच्या लाटेसंबंधी पूर्वसूचना देण्यात आलेली असल्यास, विद्युत वितरण कंपनीकडून दुपारच्या वेळेत वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी, तसेच भारनियमन करू नये, अशा सूचना राज्याच्या उष्मालाट कृती आराखडय़ात देण्यात आल्या आहेत.

उष्णतेच्या लाटेसंदर्भात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व आयआयटी मुंबई यांच्या वतीने १३ व १४ फेब्रुवारी रोजी दोनदिवसीय राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत तज्ज्ञांनी सादर केलेले संशोधनपर अहवाल, अनुभव, कार्यपद्धती, भविष्यातील नियोजन यासंबंधी चर्चेअंती घेण्यात आलेल्या निर्णयानुसार कृती आराखडय़ाच्या माध्यमातून उष्मालाटेपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना अमलात आणाव्यात याबाबतच्या मार्गदर्शक सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

राज्य कृती आराखडय़ात उष्मालाट व्यवस्थापन कालावधी हा १ मार्च ते १५ जून असा राहील, असे जाहीर करण्यात आले आहे.

झोपडपट्टी, गर्दीची ठिकाणे, कारखाने, वीटभट्टी आणि तत्सम काम करणारे कामगार, ग्रामीण भागातील यात्रेची ठिकाणे, धार्मिक स्थळे इत्यादींचा विचार करून त्या ठिकाणी आवश्यक वैद्यकीय सुविधा सर्व आरोग्य केंद्रावर आहेत की नाहीत, याचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे.

शहरी भागातील सर्व बगिचे, उद्याने दुपारच्या वेळी बंद राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

उन्हाळय़ात व्यावसायिक इमारती, गोदामे, कारखाने अशा ठिकाणी अग्निशमन यंत्रणा वेळेवर उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करण्यात यावी, असे कृती आराखडय़ात म्हटले आहे.


हेही वाचा

मुंबईसह ठाण्यात उष्णतेची लाट कायम, पुढील 4 ते 5 दिवस पारा वाढणार

पुढील बातमी
इतर बातम्या