मुंबईसह राज्यात कोरोनाच्या ऑमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढत आहेत. त्यात येत्या काही दिवसांत थर्टी फर्स्ट पार्टीचं आयोजन सर्वत्र केलं जात आहे. त्यामुळं मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं महापालिका यावर निर्बध लावणार असल्याची चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय अनेकांच्या मनात शंका उपस्थित झाल्या आहेत. त्यामुळं मुंबईतील नववर्षाच्या पूर्वसंध्येला होऊ घातलेल्या सेलिब्रेशनविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्वपूर्ण स्पष्टीकरण दिलं.
नाताळ आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मुंबई महानगरपालिकेने यापूर्वीच नियमावली जारी केली आहे. त्यामुळं या काळात पार्ट्यांवर आणखी कठोर निर्बंध लादण्याची गरज नाही. फक्त लोकांनी मुंबई पोलीस आणि महापालिकेनं आखून दिलेल्या नियमांचं पालन करावं, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. त्यामुळं थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनवर असलेले कठोर निर्बंधाचे सावट पूर्णपणे दूर झाले आहे.
महापालिकेने गर्दीच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ३१ डिसेंबरला सभागृह, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटस फक्त ५० टक्के क्षमतेनेच चालवण्याची अट घातली आहे. ३१ डिसेंबरला मुंबईत अनेक ठिकाणी मोठमोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. नाताळ, नववर्ष पार्ट्यांवर अधिक करडी नजर ठेवण्यात येणार असून, नियमांचे पालन होत नसल्यास कठोर कारवाई होणार आहे.
त्यासाठी महापालिकेनं प्रत्येक प्रभागात २ यानुसार ४८ पथके तैनात केली आहेत. त्यासाठी प्रत्येक वॉर्डात महापालिकेकडून २ टेहळणी पथके तैनात केली जातील. वॉर्ड मोठा असल्यास आणि गरज पडल्यास ४ पथके तैनात केली जातील. ही पथके सर्व ठिकाणी नियमांचं पालन होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवून असतील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली होती.