मुंबईत धावणार विजेवर चालणाऱ्या बग्गी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईकरांसह अनेकांना बग्गीतून रपेट मारण्याचा आनंद लुटता यावा यासाठी मुंबईत विजेवर चालणाऱ्या बग्गी सुरू होत आहेत. राज्यातील इतर शहरांतही पर्यटकांसाठी अशी सुविधा सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत पर्यटकांसाठीच्या विद्युत व्हिक्टोरिया बग्गींचे अनावरण वर्षा शासकीय निवासस्थानी करण्यात आले.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब आदी उपस्थित होते. बग्गी चालक युसूफ मुसा चोरडवाला, इरफान देसाई, अजीज खान, इस्माईल चोरडवाला यांना विद्युत बग्गीच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या उपक्रमाची माहिती घेत पाहणी केली.

मुंबई व्यतिरिक्त राज्यातील पुणे, कोल्हापूर अशा पर्यटन स्थळांवरदेखील अशी सुविधा सुरू होणे गरजेचे असल्याचे पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी म्हटलं.

मुंबईतील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कीर्तीची वारसा स्थळे दाखवणे आणि प्रत्येक स्थळाजवळ संबंधित स्थळांची माहिती पर्यटकांना मिळण्याची सुविधा या गाडीत असेल. उबो राइड्ज या कंपनीकडून बग्गी चालविण्यात येणार आहे. एकूण ४० व्हिक्टोरिया बग्गी टप्प्याटप्प्याने मुंबईत चालवण्यात येतील.

पहिल्या टप्प्यात १२ दक्षिण मुंबईत सुरू करण्यात येणार आहे. या १२ बग्गींपैकी ६ बग्गी ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील ताज पॅलेस हॉटेल समोरून सुटतील. तर उरलेल्या ६ बग्गी नरिमन पॉइंट येथून सुटणार आहेत. या बग्गींमधून सायंकाळी ४ वाजल्यापासून मध्यरात्री २ वाजेपर्यंत दक्षिण मुंबईची सफर करता येईल.

घोडागाड्या बंद झाल्याने या व्यवसायातील सुमारे २५० बेरोजगारांना यात सामावून घेतले जाणार आहे. ही बग्गी पर्यावरणपूरक लिथियम बॅटरीवर चालणारी आहे. एकदा बॅटरी चार्ज झाल्यावर ७० ते ८० किमीपर्यंत प्रवास शक्य होणार आहे.

मुंबईनंतर जुहू, बँडस्टँड, ठाणे तलाव पाळी इत्यादी ठिकाणी या सेवेचा विस्तार तर मुंबईबाहेरील पर्यटन स्थळांवरही लवकरच सेवा सुरू केली जाणार असून मुंबईतील मोठ्या रेस्टॉरंटसोबतही त्यासाठी करार केले जातील.

पुढील बातमी
इतर बातम्या