खारघर उड्डाणपुलावर मोठे खड्डे

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सततच्या मुसळधार पावसामुळे सायन-पनवेल महामार्गावरील खारघर उड्डाणपुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावला असून, वाहनचालकांना खड्डे चुकवण्यासाठी वारंवार लेन बदलावी लागत आहे. परिणामी, अपघाताचा धोका वाढला असून वाहनांचेही नुकसान होत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत.

मुंबई, नवी मुंबई आणि पनवेलदरम्यान दररोज हजारो प्रवासी वापरत असलेला खारघर उड्डाणपूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) अखत्यारीत येतो. मात्र, सततच्या पावसामुळे पुलावरील रस्त्याची अवस्था अधिकच खराब झाली आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिक आणि वाहनचालकांनी तातडीने खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी संबंधित प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येची दखल घेतली असून, हवामान अनुकूल होताच दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल, असे सांगितले आहे. मात्र, तोपर्यंत खड्ड्यांमुळे विशेषतः गर्दीच्या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, प्रवाशांचा प्रवास खोळंबत आहे.


हेही वाचा

पाणी तुंबण्यावरून महायुती सरकारवर भास्कर जाधवांची टीका

पुढील बातमी
इतर बातम्या