मुंबईकरांनो, पावसाळ्यात आजारांपासून सावध रहा!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असल्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या आजारांबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. दरवर्षी मुंबई महापालिका देखील पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या आजारांना आळा बसावा, याकरता जनजागृती मोहीम हाती घेते. परंतु पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबई शहरातल्या विविध भागांमध्ये पावसाळ्यात साचलेल्या पाण्यापासून होणाऱ्या आजारांची जनजागृती व्हावी, यासाठी 'इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशन' मुंबईमध्ये विविध ठिकाणी जाऊन शिबिराच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.

शाळेला सुट्ट्या असल्यामुळे सध्या वेगवेगळ्या सोसायटींमध्ये ही जनजागृृती मोहीम 'इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशन'ने आखली असून, शाळा सुरू होताच मुंबईतील शाळांमध्ये देखील ही मोहीम राबवली जाणार आहे. 'इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशन' ही संस्था गेली 50 वर्षे जनजागृती करण्याचे काम भारतभर करत आहे. शहारातल्या अनेकांना डेंग्यू, मलेरियाच्या डासांची उत्पती कशी होते? याची कल्पना नसल्यामुळे ते उपायोजना करू शकत नाहीत. अशा लोकांना माहिती देण्याचे काम ही संस्था करते. तसेच जून महिन्यात 'पेस्ट कंट्रोल डे' असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती करण्याचा इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशनचा मानस आहे.

पावसाळ्यात होणारे आजार -

दूषित पाण्यापासून 5 ते 6 प्रकारचे आजार होतात. त्यात गॅस्ट्रो हा पहिला आजार. गॅस्ट्रोच्या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर 4 ते 5 तासांत ही लक्षणे दिसू लागतात. पावसाळ्यात ही लक्षणे साथीच्या आजारासारखी पसरतात. उलटी, जुलाब झाल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. रुग्णाला दूषित पाणी प्यायल्याने गॅस्ट्रो होतो. शरीरातील पाणी कमी झाल्याने अखेर रुग्णाला सलाइन लावण्याची वेळ येते.

दूषित पाण्याच्या माध्यमातून शरीरात विषाणूंचा प्रवेश होतो. जलजन्य आजारांमुळे पोटांचे विकार बळावतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर एक ते दोन दिवसांत खूप जुलाब सुरू होतात. पोटात खूप दुखते, कळा येतात. 3 ते 4 दिवसांत प्रकर्षाने ताप येतो. त्यामुळे अनेकदा अॅन्टीबायोटिक्स देऊन रुग्णाला बरे केले जाते.

दूषित पाण्यामुळे काविळीसारखा तिसरा प्रकार होतो. काविळीमध्ये हेपेटायटिस 'ए' किंवा 'इ' हे प्रकार झाल्याचे आढळतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर 7 ते 8 दिवसात उलट्या, ताप, लघवी पिवळी होणे किंवा भूक मंदावणे ही लक्षणे दिसतात. त्याशिवाय 4 ते 5 दिवसांनी डोळे पिवळे दिसायला लागतात. महिना ते दीड महिना या आजाराची लक्षणे कायम राहतात. 90 ते 95 टक्के नागरिकांमध्ये हा आजार दिसून येतो. टायफॉईड हा आणखी एक आजार दूषित पाण्यामुळे होतो. 4 ते 5 दिवसांत मोठ्या प्रमाणात ताप येतो. पोटात खूप दुखते. उपचार न घेतल्यास टायफॉइडचे जंतू रक्तात मिसळतात. यामध्ये काही रुग्ण दगावण्याची भीती असते.

पुढील बातमी
इतर बातम्या