'नागरिकत्व' विरोधात चैत्यभूमीपर्यंत सर्वपक्षीय पक्षांची रॅली

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नागरिकत्व दुरूस्त कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात सर्वपक्षीय पक्ष संघटनांतर्फे रॅली काढण्यात येणार आहेत. 'हम भारत के लोग' या बॅनरखाली शुक्रवारी दादरच्या कोतवाल गार्डनपासून चैत्यभूमीपर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड आणि भाकपचे नेते प्रकाश रेड्डी यांनी गुरुवारी मुंबईत या रॅलीबाबत माहिती दिली आहे.

केंद्राच्या या दोन कायद्यांच्या विरोधात सुरू होणाऱ्या आंदोलनात कोणत्याही एका राजकीय पक्षाचा झेंडा नसणार आहे. सर्व डाव्या पुरोगामी विचारांच्या पक्ष संघटना, विद्यार्थी संघटना आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींचा या रॅलीमध्ये सहभाग असणार आहे.

या रॅलीसंदर्भात मुंबई काँग्रेस कार्यालयात झालेल्या बैठकीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, कपिल पाटील, किरण पावसकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. येत्या २४ जानेवारी रोजी एल्फिन्स्टन मिलच्या बाजूच्या कामगार स्टेडियमवर सर्वपक्षीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तसंच, विविध राजकीय पक्षांचे राष्ट्रीय नेते मार्गदर्शन करणार आहेत.

२६ जानेवारी रोजी प्रत्येक चौकात भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे सामुदायिक वाचन करण्यात येणार आहे. ३० जानेवारी रोजी गेटवे ऑफ इंडिया इथं सर्वपक्षीय मेळावा आयोजित करण्याचा प्राथमिक विचार असून, त्याबाबत आवश्यक त्या परवानग्या प्राप्त झाल्यानंतरच त्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.

महिलांचीही निदर्शने दरम्यान, सीएए आणि एनआरसीविरोधात मुंबई सिटिझन फोरमच्या पुढाकारानं आग्रीपाडा येथील वायएमसीए मैदानावर शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता महिलांचीही निदर्शनं होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यामध्ये सहभागी होणार आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या