अलिबागचं नाव बदलण्याची मागणी! 'हे' नाव देण्याचा प्रस्ताव

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भारतीय जनता पार्टीचे नेते तसेच विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरांनी अलिबागचे नाव बदल्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे. नार्वेकरांनी केलेल्या मागणीला अनेकांकडून विरोध होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नविन वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

अलिबागचे नाव बदलण्यात यावे अशी मागणी करणारं एक पत्र मुख्यमंत्री शिंदेंना दिलं होतं. अलिबागचं नाव बदलून मायनाक नगरी करावं असं या पत्रात म्हटलं होतं. "औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद पाठोपाठ आता अलिबागचे नाव बदलून मायनाक नगरी करण्यात यावे," असा उल्लेख या पत्रात होता.

तसेच नाव का बदललं जावं याबद्दलचा युक्तीवाद करताना नार्वेकरांनी, "अलिबाग येथील खांदेरी-उंदेरी बंदरावरील किल्ला आणि तेथील मायनाक भंडारी यांनी केलेल्या चिवट पराक्रमी संघर्षामुळे इंग्रजांना माघार घेण्यास भाग पाडले. मायनाक भंडारी यांनी स्वराज्याचे रक्षण केले होते. त्यामुळे औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबादनंतर अलिबागचे नाव बदलून मायनाक नगरी करण्यात यावे," असं म्हटलं होतं. तसेच अलिबागमध्ये मायनाक भंडारी यांचे भव्य स्मारक उभारण्यात आलं पाहिजे अशी मागणीही नार्वेकरांनी पत्रातून केली होती.

नार्वेकरांनी केलेल्या मागणीवरुन गुरुवारी अलिबागमधील वातावरण तापल्याचं पाहाया मिळालं. सरखेल कान्होजीराजे आंग्रेंचे वंशज रघुजीराजे आंग्रेंनी नार्वेकराच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. रघुजीराजे आंग्रेंनी नार्वेकरांच्या मागणीचा निषेध केला. तसेच त्यांनी अलिबागचे नाव बदलाची गरज नाही असं म्हटलं.

तसेच शहराचं नाव बदलायचे असेल तर सरखेल कान्होजीराजे आंग्रेंच्या नावाचा विचार प्राधान्याने व्हायला हवा अशी मागणी रघुजीराजे आंग्रेंनी केली.

अलिबागमधील जवळपास सर्वच स्थानिक नेत्यांनी नार्वेकरांच्या या मागणीला कडकडून विरोध केला आहे. शहराचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनीही नार्वेकरांच्या मागणीला विरोध केला. "नार्वेकरांनी केलेली अलिबागच्या नामांतराची मागणी चुकीची असून त्यांचा विरोध व्हायलाच हवा. मुळात अलिबागकरांनी नामांतराबाबत मागणी केलेली नाही. अशावेळी नार्वेकरांनी नामांतराची मागणी करण्याची गरजच नाही," असं नाईक यांनी आपली भूमिका मांडता म्हटलं आहे.


हेही वाचा

पुढील बातमी
इतर बातम्या