'सध्या मुंबईतील वातावरण जातीयवादाने गढूळ झालं आहे. ते निवळण्याची आवश्यकता आहे. दोन जातींमधील तेढ कमी झाल्यानंतर आणि समाजात जातीयवाद पसरवणाऱ्यांना अटक झाल्यानंतर आपण मुंबईत सभा घेऊ', असा निर्णय संभाजी भिडे यांनी घेतला आहे. यामुळे भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी ७ जानेवारी रोजी होणारी रद्द केली आहे.
मागील आठवड्यात मुंबईत आणि राज्यभरात अनेक घटना घडल्या आहेत. त्यांचे नेमके सूत्रधार कोण याची चौकशी सुरू आहे. सरकार त्यांना लवकरच समोर आणेल यावर आमचा विश्वास आहे, असं शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे मुंबईचे कार्यवाह बळवंत दळवी यांनी सांगितलं. ७ जानेवारीला होणाऱ्या संभाजी भिडेंच्या व्याख्यानाची तयारी महिन्याभरापासून सुरू आहे. मात्र अचानक १ तारखेची दुर्दैवी घटना घडली आणि भिडेंचं नाव त्यात गोवलं गेलं. यामुळे व्याख्यानाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. सध्या अनेक जातीयवादी संघटना आक्रमक झाल्या असून हिंदू मुस्लिम आणि इतर जातींमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंबेडकरांच्या एका वाक्यानुसार आपण आधी भारतीय आहोत आणि मग वेगवेगळ्या जातीचे, त्यामुळे जनतेचं नुकसान होऊ न देणे हा उद्देश समोर ठेवून आम्ही भिडे गुरुजींची सभा तूर्तास पुढे ढकलत असल्याची माहिती शिवप्रतिष्ठानच्य धारकऱ्यांनी दिली.
'ज्यांनी भिडे गुरुजींविरोधात आरोप केले, त्यांनी राजकारणाशिवाय इतर काही केले नाही. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याला महत्त्व नाही, कारण मागील काही दिवस ते वाटेल ते वक्तव्य करत आहेत', असं धारकऱ्यांनी सांगितलं. जातीयवादी संघटना कोणत्या आणि तुम्ही त्यांच्यावर का आरोप करता?, असा प्रश्न केला असता प्रकाश आंबेडकरांनी आरोप केले तेव्हा त्यांच्याकडे पुरावे मागितले का असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून विचारण्यात आला. ज्या महिलेने भिडेंविरुद्ध तक्रार केली, त्याच महिलेचा बोलवता धनी कोण हे चौकशीतून समोर यावं आणि सत्य लोकांसमोर मंडावं', अशी मागणी सरकारकडे केली आहे.