शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये पुन्हा शाळा सुरु होणार नाहीत

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक आहे. त्यामुळं या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सध्याची राज्यातील परिस्थीती लक्षात घेता १४ एप्रिल नंतर शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये पुन्हा शाळा सुरु करण्यात येऊ नयेत अशा सूचना शालेय शिक्षण विभागामार्फत अधिकृतरीत्या देण्यात आल्या आहेत. राज्य शिक्षण विभागाकडून १० वी भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला असून, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं त्यावर प्रचलित पद्धतीनुसार कार्यवाही करावी आणि ९वी व ११वीच्या विद्यार्थ्यांना ही पुढच्या वर्गात पदोन्नती द्यावी असे निर्देश शिक्षण आयुक्ताना देण्यात आले आहेत.

संचारबंदीमुळे १०वी व १२वीच्या उत्तरपत्रिका तपासणीबद्दल लॉकडाऊन संपल्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. दरवर्षी १ली ते ८वीच्या इयत्तांचे निकाल ३० एप्रिलपर्यंत जाहीर केल्यानंतर मे महिन्याच्या २ ते ३ तारखेपासून शाळांना सुट्टी लागते आणि १५ जूनपासून पुन्हा शाळा सुरु केल्या जातात. मात्र सध्याची राज्यातील परिस्थिती आणि लॉकडाऊन यांमुळं सगळ्याच प्रकारच्या शैक्षणिक संस्था सध्या बंद असून पुढील आदेशापर्यंत ३ मे पर्यंत त्या बंदच असणार आहेत.

या पार्श्वभूमीवर २०१९ -२० या शैक्षणिक वर्षात शाळा पुन्हा सुरु करण्यात येऊ नयेत अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. संचारबंदीमुळे १०वी, १२वीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांपर्यंत पोहोचवणं, तपासलेल्या उत्तरपत्रिका सरपरीक्षक (मॉडरेटर) आणि विभागीय मंडळाकडे पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे यंदा १०वी-१२वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरही लॉकडाऊन संपल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येणार असे स्पष्ट करण्यात आले आहे.

यंदा दहावी बारावीचे निकाल ही लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संचारबंदी लागू झाल्यानंतर हा नियम शिथिल करून खास बाब म्हणून यंदा उत्तरपत्रिका घरी नेऊन तपासण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र सध्यपरिस्थितीत त्या शिक्षकांपर्यंत पोहचवणे ही शक्य नसल्याने मंडळाने हा निर्णय घेतला आहे.  

पुढील बातमी
इतर बातम्या