शिवभोजन थाळी संदर्भात राज्य सरकारनं घेतला 'हा' निर्णय

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यातल्या गरीब आणि गरजूंना १४ जूनपर्यंत शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. सध्या राज्यात सुरु असलेल्या ब्रेक द चेन या अभियानांतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातल्या विविध समाजघटकांसाठी मदतीचे पॅकेज घोषित केले होते.

या पॅकेजमध्ये राज्यातल्या गरीब आणि गरजू लोकांना १५ एप्रिलपासून पुढे एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी अंतर्गत मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली होती. दरम्यान आता ही मुदत आणखी एका महिन्याभरासाठी वाढवण्यात आली आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन सादर केलेल्या याबाबतच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. १४ मे रोजी यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीच्या राज्याच्या प्रतिदिन संख्येतही दीडपट वाढ करण्यात आली आहे.

१५ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ पर्यंत ४८ लाख ४४ हजार ७०९ नागरिकांनी मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनासारख्या अडचणी काळात मोफत शिवभोजन थाळीने राज्यातील गरीब जनतेला मोठा आधार मिळाला आहे.

राज्यभरात शिवभोजन थाळी योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत जवळपास ४ कोटी २७ लाख ८१ हजार ३०६ थाळ्यांचे वितरण झाले. शिवभोजन योजनेअंतर्गत राज्यभरात एकूण ९५० केंद्र सुरू आहेत.


पुढील बातमी
इतर बातम्या