शिवस्मारक बोट अपघातप्रकरणाची चौकशी 'फास्ट ट्रॅक'वर केली जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसकर यांनी दिली आहे. या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.
बुधवारी ४.०० वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी पत्रकार, अधिकारी, एल अॅण्ड टीचे अधिकारी-कर्मचारी आणि शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना घेऊन बोटींचा ताफा अरबी समुद्रातील स्मारकाच्या ठिकाणी निघाला. त्यादरम्यान सव्वा चारच्या सुमारास या ताफ्यातील एक स्पीड बोट खडकावर आदळली आणि या अपघातात सिद्धेश पवार या तरूणाचा बुडून मृत्यू झाला. सुदैवाने बोटीतील इतर २४ जणांना वाचवण्यात यश आलं.
पायाभरणी कार्यक्रमावेळी आयोजकांकडून कोणतंही नियोजन करण्यात आलं नसल्याचं तसंच बोटीतील लोकांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली नसल्याचा आरोप या अपघातानंतर होऊ लागला आहे. तर बोटीत क्षमतेपेक्षा अधिक लोकांना बसवण्यात आल्याचाही आरोप होतो आहे. काँग्रेसने तर घातपाताची शक्यता व्यक्त करत या प्रकरणाच्या न्यायालायीन चौकशीचीही मागणी केली आहे.
शिवसेनेनेही हा अपघात नियोजनशून्य कारभारामुळंच झाल्याचं म्हणत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी इतक्या मोठ्या संख्येने लोकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या सर्व दोषींविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत सिद्धेश पवार यांच्या कुटुंबाला ५ लाखाची मदत जाहीर करत या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. गुरूवारी केसरकर यांनीही या अपघाताची चौकशी फास्ट ट्रॅकवर करण्यात येईल. या चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्याविरोधात कडक कारवाई होईल असं जाहीर केलं आहे.
हेही वाचा-
शिवस्मारक बोट अपघाताची चौकशी होणार, मृताच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत - मुख्यमंत्री
शिवस्मारकाच्या पायाभरणी ताफ्यातील बोटीला अपघात, १ जण बुडाल्याची भीती