14 ते 18 सप्टेंबरदरम्यान पाच दिवस हा गणेशोत्सव पार पडणार आहे. त्याआधी 12 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता ‘विराट दर्शन दिना’निमित्त महागणपतीची पहिली झलक भाविकांना पाहता येणार आहे.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी मंडळाने तब्बल 703.27 कोटींचं विमा कवच घेतलं आहे.
गणेशोत्सवादरम्यान भाविकांची सुरक्षितता आणि मंडळाच्या मौल्यवान वस्तूंचं संरक्षण यासाठी हा विमा काढण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलं.
‘नवसाला पावणारा विश्वाचा राजा’ अशी भाविकांची श्रद्धा असलेल्या या महागणपतीच्या दर्शनासाठी देश-विदेशातून भाविक येतात.
मंडळाचे संयोजक डॉ. भुजंग पाई यांच्या माहितीनुसार, गणपतीची मूर्ती 66 किलोहून अधिक सोन्याच्या दागिन्यांनी, 335 किलोहून अधिक चांदी आणि मौल्यवान रत्नांनी सजवली जाते.
हे दागिने प्रामुख्याने भाविक आणि सेवेकऱ्यांकडून अर्पण केले जातात.
GSB सेवा मंडळाच्या गणेशोत्सवातील अन्नदान सेवा हे प्रमुख आकर्षण आहे.
दररोज 40 हजारांहून अधिक भाविकांना प्रसादाचं भोजन दिलं जातं. त्यामुळे पाच दिवसांत 2 लाखांहून अधिक भाविकांना या अन्नदान सेवेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
पारंपरिक पद्धतीने केळीच्या पानावर प्रसादाचं भोजन दिलं जातं.
गणेशोत्सवादरम्यान महागणपतीला सरासरी एक लाखांहून अधिक पूजा आणि सेवा अर्पण केल्या जातात.
यामध्ये—
पूजा
अर्चना
सेवा
अन्नदान
तुलाभार
गणहोम
यांचा समावेश आहे. हे सर्व धार्मिक विधी शास्त्रांमध्ये सांगितलेल्या परंपरा आणि वैदिक पद्धतीनुसार केले जातात.
पारंपरिक धार्मिक विधी कायम ठेवतानाच मंडळाने यंदा पर्यावरण संवर्धनावर विशेष भर दिला आहे.
मंडळाने कागदाचा वापर कमी करण्यासाठी छापील पावत्यांची पद्धत बंद करून डिजिटल प्रणाली स्वीकारली आहे.
तसंच, महागणपतीची मूर्तीही पर्यावरणपूरक असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे.
म्हणजेच वैदिक परंपरा कायम ठेवत डिजिटलायझेशन आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचा स्वीकार, असा यंदाच्या गणेशोत्सवाचा दुहेरी प्रयत्न असणार आहे.
12 सप्टेंबरला महागणपतीची पहिली झलक आणि 14 सप्टेंबरपासून पाच दिवसांचा उत्सव सुरू होणार असल्याने GSB सेवा मंडळाच्या गणेशोत्सवाकडे मुंबईसह देशभरातील भाविकांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा