महाराष्ट्र सरकारने Mumbai Metro Line 5 चा विस्तार आणि नवीन Mumbai Metro Line 5A या एकत्रित प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या दोन्ही मार्गांमुळे ठाणे–भिवंडी–कल्याण–उल्हासनगर परिसरात एकूण ३४.२ किमी लांबीचे मेट्रो नेटवर्क उभारले जाणार असून, यासाठी अंदाजे ₹१८,१३०.५५ कोटी खर्च अपेक्षित आहे.
मुळात ऑक्टोबर 2017 मध्ये मंजूर झालेली मेट्रो 5 ही 24.9 किमी लांबीची उंचावरील (elevated) मार्गिका आहे. ठाणे, भिवंडी आणि कल्याणला जोडणाऱ्या 17 स्थानकांचा समावेश होता. हा प्रकल्प दोन टप्प्यांत राबवला जात आहे.
पहिला टप्पा:
ठाणे ते भिवंडी दरम्यानचा 11.9 किमी मार्ग (6 स्थानके) अंतिम टप्प्यात आहे. पुनर्वसनाच्या अडचणी कमी असल्यामुळे या भागाचे काम तुलनेने वेगाने पूर्ण होत आहे.
दुसरा टप्पा:
भिवंडी ते कल्याण दरम्यानचा 10.475 किमी मार्ग (6 स्थानके) मात्र अतिक्रमणांमुळे विलंबित झाला आहे.
जून 2023 मध्ये दुर्गाडी ते कल्याण या भागातील काही मार्ग उंचावरीलऐवजी भूमिगत करण्यात आला, ज्यामुळे 1,427 कोटी खर्च वाढला.
जून 2025 मध्ये पुन्हा डिझाइन बदल करून धमणकर नाका ते तेमघर दरम्यान काही भाग भूमिगत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या टप्प्याचा खर्च आता 7,326.13 कोटी इतका झाला आहे.
मेट्रो 5 आता कल्याणपर्यंत न जाता दुर्गाडी येथेच संपेल. कल्याण आणि पुढील भागाशी कनेक्टिव्हिटी राखण्यासाठी नवीन मेट्रो 5A सुरू करण्यात आली आहे.
मेट्रो 5A वैशिष्ट्ये:
लांबी: 11.83 किमी
मार्ग: दुर्गाडी – आधारवाडी – खडकपाडा – कल्याण – पुढे उल्हासनगर
स्थानके: 7
अंदाजित खर्च: 4,063 कोटी
या दोन्ही मार्गांमुळे एकत्रितपणे 19 स्थानकांचे जाळे तयार होईल, ज्यामध्ये दुर्गाडी येथे इंटरचेंज असेल.
याशिवाय, भिवंडीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रांजणोली जंक्शन ते दुर्गाडी चौक दरम्यान डबल-डेकर स्ट्रक्चर (फ्लायओव्हर + मेट्रो) उभारण्यात येणार आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, या प्रकल्पात ट्रान्झिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट (TOD) आणि स्थानकांवरील व्यावसायिक वापराचा समावेश करून आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हेही वाचा