मुंबईच्या ईस्टर्न फ्रीवेवर बुधवारी एका कारचं नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात दोन महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. प्रणित शाह (२०) आणि ऋषभ जैन (२१) अशी या मृत तरुणांची नावं असून त्यांचा तिसरा मित्र अभिजीत जैन (२१) हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शिव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे तिघेही मुंबईतील खारघरच्या बेलापूर येथे उच्चशिक्षण घेण्यासाठी आले होते. नुकतंच ते बेलापूर येथील एका हाॅस्टेलमध्ये राहत होते. मंगळवारी या मुलांची परीक्षा संपल्यानंतर तिघे रात्रीच्या वेळी मुंबई दर्शनाचा बेत आखला होता. त्यानुसार मंगळवारी रात्री ते संपू्र्ण मुंबई फिरून बुधवारी पहाटे ईस्टर्न फ्री वेने पुन्हा बेलापूरच्या दिशेने निघाले होते.
रात्रीची वेळ असल्यानं रस्ते मोकळे होते. त्यामुळे ते तिघे कार वेगाने चालवत होते. त्यावेळी चेबूरजवळील एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार फ्रीवेवरील लोखंडी पोलला धडकली. या अपघातात गाडीचे पुढील बोनट पुर्णत: तुटल्याच आढळून आलं.
या भीषण अपघाताच्या आवाजाने स्थानिक रहिवाशांनी त्या ठिकाणी धाव घेत, तिन्ही जखमींना जवळील रुग्णालयात नेले. त्यावेळी डाॅक्टरांनी प्रणित आणि ऋषभला मृत घोषित केलं. सध्या आरसीएफ पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
हेही वाचा -
शिवस्मारक बोट अपघाताची चौकशी होणार, मृताच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत - मुख्यमंत्री