बाबला टँक आणि रफी अहमद किडवाई मार्गावरील जलवाहिनीच्या जोडणीच्या कामासाठी येत्या बुधवारी २१ फेब्रुवारीला पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे कुलाबा ते परळमधील रहिवाशांना बुधवारी पाणी पुरवठा होणार नसून या भागातील रहिवाशांनी आधीच पाण्याचा वापर जपून करावा, असं आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आलं आहे.
मुंबई महापालिकेच्या भंडारवाडा जलाशय येथे जुन्या १२०० मि.मी. व्यासाच्या बाबला टँक जलवहिनीची दुरुस्ती तसेच रफी अहमद किडवाई मार्गावर नया नगर, माथारपखाडी व शिवडी कोर्ट जंक्शन येथे नवीन १५०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी सुरु करण्यासाठी जुन्या जलवाहिनीसोबत जोडणी करण्याचं काम बुधवारी २१ फेब्रुवारी, २०१८ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून ते रात्री १०.०० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.
या कामासाठी भंडारवाडा टेकडी जलाशय, गोलंजी टेकडी जलाशय, फोसबेरी जलाशय १२ तासांकरीता बंद करावे लागणार आहेत. त्यामुळे बुधवारी कुलाबा ते परळपर्यंतच्या नागरिकांना पाणी पुरवठा होणार नाही, असं जलअभियंता विभागाने स्पष्ट केलं आहे. या कामामुळे बुधवारी शहर भागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही, तसेच काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी राहील. या पाणीकपाती दरम्यान जलाशयातील पातळी लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास विभागवार पाण्याच्या वेळेत बदल करण्यात येतील, असं जलअभियंता अशोककुमार तवाडिया यांनी सांगितलं.